• Sun. Mar 8th, 2026

    ADAS System: रस्ते अपघात कमी करण्यासाठी सरकारचं महत्त्वाचं पाऊल, 2027पासून ‘या’ वाहनांना ‘ॲडास’ बंधनकाराक; कसं आहे नवं तंत्रज्ञान?

    ADAS System: रस्ते अपघात कमी करण्यासाठी सरकारचं महत्त्वाचं पाऊल, 2027पासून ‘या’ वाहनांना ‘ॲडास’ बंधनकाराक; कसं आहे नवं तंत्रज्ञान?

    म.टा. प्रतिनिधी, पुणे: देशात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलून पुढील वर्षीपासून म्हणजेच सन २०२७ पासून नव्या व्यावसायिक जड वाहनांमध्ये ‘ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम्स’ (ॲडास) तंत्रज्ञान बंधनकारक करण्यात येणार आहे. इतर चारचाकी वाहनांसाठीदेखील हे तंत्रज्ञान बंधनकारक करण्याबाबत केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाला प्रस्ताव पाठविण्यात आला असून, त्याची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार आहे.

    ‘एआरएआय’ने देशातील पहिले समर्पित ‘ॲडास’ चाचणी केंद्र पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडेजवळील टाकवे येथे उभारले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ‘एआरएआय’चे संचालक डॉ. रेजी मथाई यांनी ही माहिती दिली.

    Mumbai Traffic: मुंबईकरांनो, ‘या’ महत्त्वाच्या पुलावर जड वाहनांना 3 महिने ‘नो एन्ट्री’; आता पर्यायी मार्ग कोणते? पाहा नवी नियमावली

    डॉ. मथाई म्हणाले, ‘सन २०२७ पासून नव्या व्यावसायिक वाहनांसाठी ‘ॲडास’ तंत्रज्ञान बंधनकारक करण्यात येणार आहे. नव्या मॉडेलच्या व्यावसायिक वाहनांसाठी ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग (एईबी), ड्रायव्हर ड्राउझीनेस डिटेक्शन (चालकाला झोप येत असल्याची ओळख), ब्लाइंड-स्पॉट डिटेक्शन, लेन डिपार्चर वॉर्निंग (ईसीएफ) आणि मूव्हिंग ऑब्जेक्ट डिटेक्शन (विशेषतः मोठ्या वाहनांच्या आसपास न दिसणाऱ्या वस्तूंसाठी) ही पाच ‘ॲडास’ वैशिष्ट्ये अनिवार्य असतील.’

    प्रत्यक्ष रस्त्यावरील डेटा संकलन

    ‘एआरएआय’ने देशातील सुवर्ण चौकोन, निवडक राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग, काही शहरी भागांमध्ये डेटा संकलन वाहने तैनात केली आहेत. या वाहनांद्वारे चित्रफीत (व्हिडिओ), रडार, जीपीएस माहिती ही दिवस, रात्र, पाऊस, धुके आणि तीव्र उन्हाच्या परिस्थितीत संकलित केली जाते. हा चाचणी केंद्रातील रस्त्यावर पुन्हा निर्माण करून संवेदक आणि संगणक प्रणालीचे परीक्षण केले जाते.

    डॉ. रेजी मथाई यांनी सांगितले की, महामार्गांवर गाड्यांसाठी लेनची शिस्त आणि रस्त्याची रचना स्पष्ट असते. त्यामुळे, जर ‘ॲडास’ तंत्रज्ञान सुरुवातीला महामार्गांवर वापरले गेले, तर अपघातांचे प्रमाण आणि त्यामुळे होणारे मृत्यू लक्षणीयरीत्या कमी होतील. सध्या भारतात ‘ॲडास’चे प्रमाणीकरण मुख्यत्वे युरोपीय संघ किंवा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक नियमांनुसार केले जाते. पण आता भारत स्वतःच्या गरजांनुसार ‘कार सुरक्षा मूल्यांकन कार्यक्रम’ (Car Safety Assessment Program) अंतर्गत नवीन नियम बनवण्याच्या तयारीत आहे.

    Maharashtra TimesKonkan Railway: लोकलपाठोपाठ कोकण रेल्वेचं वेळापत्रकही कोलमडलं, तेजस एक्सप्रेस सहा तर मांडवी तीन तास विलंबाने; प्रवाशांचे मोठे हाल

    काही कंपन्या स्वतःहून गाड्यांमध्ये ‘ॲडास’ची काही वैशिष्ट्ये देत आहेत. मात्र, काही कंपन्या भारतात हे तंत्रज्ञान कसे काम करेल याबद्दल थोड्या साशंक आहेत. हे नवीन केंद्र भारतीय रस्त्यांच्या विशिष्ट परिस्थितीनुसार ‘ॲडास’ तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यास मदत करेल. यामुळे भारतीय रस्त्यांवर ‘ॲडास’ तंत्रज्ञान अधिक सुरक्षित आणि प्रभावीपणे वापरता येईल.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed