भाजपनं शत-प्रतिशतची तयारी सुरु केली आहे. भाजपनं १९९५ मध्ये गुजरातमध्ये सत्ता मिळवली. तेव्हापासून भाजप सत्तेत आहे. या कालावधीत राज्यातील काँग्रेस पार नेस्तनाबूत झाली आहे. भाजपनं पद्धतशीरपणे काँग्रेसचे अनेक नेते गळाला लावले. पक्षाच्या अध्यक्षांची निष्क्रियता, दूरपर्यंत सत्ता मिळण्याची नसलेली आशा यामुळे काँग्रेसचे अनेक नेते भाजपकडे वळले. यामुळे भाजपला दुहेरी फायदा झाला. मतदारांमध्ये एँटी इन्कम्बन्सी असल्याचं लक्षात येताच भाजपनं घाऊक प्रमाणात विद्यमान आमदारांची तिकिटं कापली आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली. काँग्रेसचे गळाला लावलेले नेते याच सुमारास भाजपच्या कामी आले. प्रतिस्पर्धांकडे तुल्यबळ नेते, उमेदवारच ठेवायचे नाही, ही रणनीती भाजपनं गुजरातमध्ये वापरली.
महाराष्ट्रात गुजरातसारखी परिस्थिती नाही. इथे दोन राष्ट्रीय आणि दोन प्रादेशिक पक्ष आहेत. त्यातील दोन पक्षांची शकलं झाली आहेत. त्यातील प्रत्येकी एक-एक गट सत्तेत आहे. विरोधी बाकांवरील पक्षांची अवस्था गलितगात्र झालेली आहे. काँग्रेसची अवस्था बिकट आहे. त्यामुळे गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातला विरोधी पक्ष अतिशय कमकुवत स्थितीत आहे. इथपर्यंत गुजरात मॉडेल व्यवस्थित लागू झालं आहे. नगर पंचायत, महापालिका यांच्या पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका जिंकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी हॅट्ट्रिक केलेली आहे. आता पुढील ३ वर्षे तरीही राज्यात कोणत्याही निवडणुका नाहीत.
२०२९ मध्ये भाजपला स्वबळावर लढायचं आहे. विरोधकांची अवस्था तोळामासा झालेली आहे. त्यामुळे २०२९ मध्ये भाजप समोर मित्रपक्षांचं आव्हान असेल. एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असल्यानं त्यांची अवस्था चांगली आहे. सत्तेचा लाभ मिळत असल्यानं त्यांनी नोव्हेंबरपासून झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दुसरा, तिसरा क्रमांक पटकावला. याच पक्षांशी भाजपला २०२९ मध्ये दोन हात करावे लागतील.
विरोधी पक्षांमधील तगडे नेते गळाला लावून मित्रपक्षांच्या बालेकिल्ल्यांमध्ये आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून अतिशय पद्धतशीरपणे सुरु आहे. शिवसेनेचे नेते, मंत्री शंभुराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघात सत्यजीत पाटणकर यांचा पक्षप्रवेश घडवून आणण्यात आला आहे. पुण्यातील भोर मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हाती कमळ देण्यात आलं आहे. थोपटे कुटुंबानं तब्बल ४० वर्षे भोरवर वर्चस्व गाजवलं आहे. २०२४ मध्ये भोरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर विजयी झाले आहेत. पाटणकर, थोपटे यांच्यापासून सुरु होत असलेली यादी बरीच मोठी आहे. त्यामुळे मित्रपक्षांचे मतदारसंघ, आमदार भाजपच्या रडारवर आहेत, हे अगदी स्पष्ट आहे. शिंदेंच्या ठाण्यात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण पद्धतशीरपणे शिवसेनेला सुरुंग लावत आहेत.
काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शपचे तगडे नेते गळाला लावायचे. त्यांच्या मदतीनं मित्रपक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघांमध्ये फिल्डींग लावायची, असं तंत्र भाजपकडून वापरलं जात आहे. एकाच वेळी विरोधी पक्षाला कमकुवत करायचं, मित्रपक्षाच्या आमदारांविरोधात तगडे पर्याय उभे करायचे अशी खेळी भाजपनं सुरु केली. विशेष म्हणजे भाजपनं गळाला लावलेल्या याच नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला अनेक ठिकाणी चांगलं यश मिळवून दिलं आहे. राणा जगजीतसिंह पाटील, शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, जयकुमार गोरे यांच्यासारखी नेतेमंडळी भाजपला ग्रामीण पट्ट्यात यश मिळवून देत आहेत.
गुजरातमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट संघर्ष होता. दोनच प्रमुख पक्ष होते. पण महाराष्ट्रात सहा पक्ष असल्यानं परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे हायब्रीड गुजरात मॉडेल राबवलं जात आहे. नोव्हेंबरपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु झाल्या. नगर पंचायत, महापालिका यांच्या पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये भाजपनं पहिला क्रमांक पटकावला. भाजपच्या मित्रपक्षांनी त्यांच्या खालोखाल कामगिरी केली. आता २०२९ मध्ये भाजप समोर याच मित्रपक्षांचं आव्हान असेल.