• Wed. Jun 17th, 2026

    Raigad ZP Election : भाजपचं महत्त्वाचं पाऊल, रायगड जिल्हा परिषदेत मोठा ट्विस्ट, सत्ता समीकरण बदलणार?

    Raigad ZP Election : भाजपचं महत्त्वाचं पाऊल, रायगड जिल्हा परिषदेत मोठा ट्विस्ट, सत्ता समीकरण बदलणार?

    रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली होती. पण निकालानंतर आता भाजपने स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेत सत्ता समीकरण बदलणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाने 15 नवनिर्वाचित सदस्यांचा स्वतंत्र गट नोंदवून सत्ता स्थापनेच्या दृष्टीने महत्त्वाची चाल खेळली आहे. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपने अधिकृतरित्या स्वतंत्र गटाची नोंदणी केली असून, त्यानंतर झालेल्या बैठकीत पेण येथील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आणि माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांची भाजप गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.

    भाजपच्या या निर्णयामुळे रायगड जिल्हा परिषदेत सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीपूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती झाली होती. मात्र निवडणूक निकालानंतर दोन्ही पक्षांनी संयुक्त गट नोंदणी न करता स्वतंत्र गट नोंदणी करण्याची भूमिका घेतल्याने जिल्हा परिषद राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. भाजपचे 15 सदस्य विजयी झाले असून, पक्षाने दाखवलेली ही एकजूट भविष्यातील सत्ता स्थापनेसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

    दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ सदस्य निवडून आले असले तरी त्यांनी अद्याप अधिकृत गट नोंदणी केलेली नसल्याची माहिती समोर येत आहे. तसेच शिवसेना (शिंदे गट) यांनीही गट नोंदणी न केल्यामुळे राजकीय चित्र अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकत असल्याचे संकेत मिळत असून, यामुळे जिल्हा परिषद सत्तास्थापनेपूर्वीच राजकारण तापले आहे.
    Maharashtra TimesEknath Khadse : सावदा पोलीस ठाण्यात खडसे आणि पोलीस अधिकाऱ्यात वाद? शिवीगाळ केल्याचा आरोप, एकनाथ खडसेंवर गुन्हा दाखल
    स्वतंत्र गट नोंदणीमुळे भाजपने आपली ताकद दाखवत पुढाकार घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या पदांसाठी आगामी काळात कोणते समीकरण जुळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वतंत्र गट नोंदणीने “सत्ता कुणाची?” हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    बैठकीनंतर बोलताना पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, जनतेने दिलेला कौल हा विकासासाठी असून भाजपचे सर्व नवनिर्वाचित सदस्य एकत्रितपणे जिल्ह्याच्या विकासासाठी काम करतील. वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात विकासकामांना गती दिली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप सत्तास्थापनेच्या चर्चेत असला तरी सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावणे हेच पक्षाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
    Maharashtra TimesNanded Mayor : शिक्षिका ते महापौर, प्रेरणादायी प्रवास, नांदेडमध्ये इतिहास घडला
    या बैठकीस भाजप नेते आस्वाद पाटील, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) कोणती भूमिका घेतात, त्यावर रायगड जिल्हा परिषदेत सत्तेचा तोल कोणाच्या बाजूने झुकतो, हे स्पष्ट होणार आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा