• Fri. Mar 6th, 2026

    डोंबिवलीच्या सोहमचा लोकलमधून पडून बळी, वडील ZP मतदानासाठी गावी, आई-भावापासून संध्याकाळपर्यंत लपवलेलं; आता दादाची हात जोडून मागणी

    डोंबिवलीच्या सोहमचा लोकलमधून पडून बळी, वडील ZP मतदानासाठी गावी, आई-भावापासून संध्याकाळपर्यंत लपवलेलं; आता दादाची हात जोडून मागणी

    Dombivli Student falls from Local : कळवा–मुंब्रादरम्यानच्या धोकादायक वळणावर काल सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यानंतर रेल्वे प्रवासी संघटनांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, डोंबिवली : विज्ञान शाखेचा पहिला पेपर देण्यासाठी जात असलेल्या बारावीच्या विद्यार्थ्याचा मंगळवारी प्रचंड गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाला. कळवा–मुंब्रादरम्यानच्या धोकादायक वळणावर सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रेल्वे प्रवासी संघटनांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

    दीड वर्षांपूर्वी डोंबिवलीत शिफ्ट

    सोहम कटरे (१८) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडील आजदे परिसरात ‘सीता कुंज-१’ या इमारतीत तो आई-वडील आणि भावासोबत राहत होता. हे कुटुंब दीड वर्षापूर्वी कळवा येथून डोंबिवलीत स्थलांतरित झाले होते. सोहम कळवा येथील परीक्षा केंद्रावर जात असताना काळाने त्याच्यावर झडप घातली.सोहमचे वडील सचिन कटरे हे इस्टेट एजंट असून, त्याची आई कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावण्यासाठी एका दुकानात काम करते. ही दुर्घटना घडली तेव्हा सचिन हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी गावी गेले होते. मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांनी तातडीने कळवा रुग्णालय गाठले. या दुर्घटनेबाबत सोहमची आई आणि भावाला संध्याकाळी उशिरापर्यंत माहिती देण्यात आली नव्हती.
    Maharashtra TimesCrime News : सासूचे अनैतिक संबंध; भलत्या मागणीमुळे सुनेने आयुष्य संपवलं, पाटील कुटुंबात काय घडलं?

    विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डब्याची मागणी

    सोहमच्या मृत्यूनंतर ‘रेल्वे अजून किती बळी घेणार’, असा संतप्त प्रश्न रेल्वे प्रवासी संघटनांनी उपस्थित केला. या घटनेविरोधात आज, बुधवारी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात काळ्या फिती लावून रेल्वेच्या निष्काळजीचा निषेध करण्यात येणार आहे. यात प्रवाशांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन या संघटनांनी केले आहे. तसेच, गर्दीच्या प्रवासाची सवय नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डब्याची व्यवस्था करण्याची मागणीही या निमित्ताने करण्यात येत आहे.
    Maharashtra TimesMumbai Crime : जुहू बीचवरील बॉडीचं गूढ CCTV मुळे उकललं; मित्राच्या बायकोशी लफडं, 30 वर्षीय तरुणासोबत काय घडलं?

    सोहमचा भाऊ काय म्हणाला?

    या अपघाताबाबत सोहमचा मावस भाऊ म्हणाला, माझी शासनाला हात जोडून विनंती आहे की सकाळच्या वेळी रेल्वे गाडीत खूप गर्दी असते. त्यामुळे परीक्षा काळात अशा विद्यार्थ्यांकरता स्पेशल लोकल सुरु करा. कारण परीक्षेची वेळ असल्यामुळे मुलांसमोर गर्दीने भरलेल्या ट्रेनमध्ये चढण्याशिवाय पर्याय उरत नाही आणि त्यामुळे अपघात घडतात.

    Mumbai News | CSMT – Goregaon local train ३ महिने बंद राहणार, लाखो प्रवासी चिंतेत

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा