मुंबईच्या विलेपार्लेत आगीची भीषण घटना घडली आहे. मुंबईतील बांधकाम व्यवसायिक जीतू सत्रा यांच्या विलेपार्ले येथील इमारतीला भीषण आग लागली. या आगीत सत्रा कुटुंबातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचा निकाल समोर येत आहे. अनेक ठिकाणी विजयी उमेदवारांकडून विजयाचा गुलाल उधळला जात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालावर वेगवेगळ्या पक्षाचे दिग्गज नेते आपापली प्रतिक्रिया देत आहेत. विजय किंवा पराभवामागचे विश्लेषण करत आहे. निवडणुकीचा हा धुराळा सुरु असताना मुंबईच्या विलेपार्ले परिसरात अतिशय दुर्देवी घटना घडली आहे. मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक जीतू सत्रा यांच्या इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत सत्रा कुटुंबातील एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
बांधकाम व्यवसायिक जीतू सत्रा यांच्या विलेपार्ले येथील इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली होती. इमारतीच्या 13 व्या मजल्यावर ही भीषण आग लागली होती. या आगीत जीतू सत्रा यांच्या भावाच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. या घटनेत जीतू सत्रा यांची मुलगी अनेरी या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे जीतू सत्रा यांच्या मुलाचं उद्या लग्न होतं. त्यामुळे त्यांचे संपूर्ण नातेवाईक हे त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.
संबंधित घटना ही आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. सुरुवातीला तेराव्या मजल्यावर ही आग लागली. त्यानंतर चौदाव्या मजल्यापर्यंत ही आग धुमसली होती. या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या आगीत दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यापैकी भावना सत्रा नावाच्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
आगीची घटना घडली तेव्हा विलेपार्ले परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती तातडीने अग्निशामक दलाला देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशामक दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. थोड्याच वेळापूर्वी संपूर्ण आग विझवण्यात आली आहे. ही आग नेमकी कशी लागली? याचा तपास आता पोलीस करत आहेत. विलेपार्ले पोलीस या प्रकरणी सविस्तर तपास करत आहेत. पण ही घटना अत्यंत धक्कादायक असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा