• Sun. Mar 15th, 2026

    अजितदादांच्या जाण्याने शरद पवार भावुक; पुतण्याचं तोंडभरून कौतुक

    ByMH LIVE NEWS

    Jan 31, 2026
    अजितदादांच्या जाण्याने शरद पवार भावुक; पुतण्याचं तोंडभरून कौतुक

    बारामती 

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बारामती येथे दुसरी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते अत्यंत भावुक झाले होते. अजित पवार यांच्या नेतृत्वगुणांचे आणि कार्यपद्धतीचे त्यांनी मनापासून कौतुक केलं. “आज अजित जिवंत असते, तर ते घरी बसले नसते, ते फिल्डवरच काम करत असते,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

    शरद पवार म्हणाले की, अजित पवार हे कर्तृत्ववान नेते होते. संघटनेत काम करताना त्यांनी नेहमीच सामान्य जनतेशी थेट संवाद साधला. लोकांचे प्रश्न समजून घेणे, त्यावर माहिती घेणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, हेच अजित पवारांचे वैशिष्ट्य होते. प्रत्येक व्यक्तीचे समाजासाठी काही ना काही योगदान असते. अजित अनेक वर्षे संघटनेत सक्रिय राहून लोकांच्या प्रश्नांसाठी झटत राहिले. त्यांची कामाची सुरुवात पहाटेच होत असे. कामात कधीही त्यांनी कमतरता दाखवली नाही,” अशा शब्दांत शरद पवार यांनी आपल्या भावना मांडल्या.

    अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का बसला असून, या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    “कर्तृत्ववान व्यक्तीचे जाणे हा संपूर्ण महाराष्ट्रावर झालेला मोठा आघात आहे. या दुःखद परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. लोकांचे दुःख कमी करण्यासाठी आम्हाला अधिक जोमाने काम करावे लागेल. यापुढे नव्या पिढीवर जबाबदारी अधिक वाढली आहे,” असे शरद पवार यांनी यावेळी नमूद केले.

    दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर, राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेतेपद कुणाकडे जाईल, उपमुख्यमंत्री कोण होईल याबाबत चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीची नेतेमंडळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यासंदर्भात भाजपची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही सरकार म्हणून आणि भाजप म्हणून ठामपणे उभे राहू. त्यामुळे अजितदादांचे कुटुंब असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो; त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांचा जो काही निर्णय होईल, त्याला योग्य ते समर्थन आमच्याकडून दिले जाईल,” असं फडणवीसांनी काल स्पष्ट केलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed