मुंबई
मुंबईतील महत्त्वाच्या अशा शीव (सायन) आणि विद्याविहार उड्डाणपूल कामांना मुंबई महापालिकेकडून गती दिली जात आहे. वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले दोन्ही पूल यंदाच्या वर्षात पावसाळ्यात सुरू होऊन वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. विद्याविहार रेल्वे स्थानकावर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल पालिकेकडून उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे संपूर्ण काम २५ जून २०२६ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. तर, शीव उड्डाणपुलाची सर्व कामे १५ जुलैपर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली.
शीव उड्डाणपुलाची कालमर्यादा
शीव उड्डाणपुलामुळे ( Sion Flyover ) पूर्व, पश्चिम भाग जोडले गेले आहेत. शीव पुलाचे रेल्वे हद्दीतील काम रेल्वे विभाग आणि पोहोच मार्ग, दोन पादचारी भुयारी मार्ग आदींचे काम महानगरपालिका करत आहे. लालबहादूर शास्त्री मार्गावरील भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. हा भुयारी पादचारी मार्ग कार्यान्वित झाल् यानंतर रेल् वे पुलाच् या पश्चिमेकडील पादचारी वाहतुकीची फेरआखणी केली जाणार आहे. पश्चिमेकडील कामाचे चार टप्पे असून या चारही टप्प्यांच्या पूर्णत्वाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. तसेच, त्यांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.
एकंदरीत, पश्चिम बाजूची सर्व कामे ३१ मे २०२६पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. रेल्वे प्रशासनाकडून ३१ मे २०२६पर्यंत पूर्व बाजूचा पोहोच रस्त्याचा ताबा महानगरपालिकेला मिळणे अपेक्षित असल्याने उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी त्यानंतर आणखी काही कालावधी आवश् यक आहे. त्याचा विचार करता या पुलाची सर्व कामे १५ जुलै २०२६पर्यंत पूर्ण केली जाणार असून पूल वाहतुकीस खुला केला जाईल, अशी माहिती मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी दिली.
कधी होणार पूर्ण?
धारावी बाजूकडील दुसऱ्या भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. रेल्वे रुळावरील जुन् या पुलाच्या उत्तरेकडील भागाचे निष्कासन करण्यात आले आहे. आता दक्षिणेकडील भागाचे निष्कासन सुरू आहे. उत्तर दिशेच्या अर्ध्या बाजूवर गर्डर स्थापित केल्यावर पूर्व बाजूचा अर्धा पोहोच रस्ता महानगरपालिकेच्या ताब्यात येईल. रेल्वे प्रशासनामार्फत शेवटचा गर्डर स्थापित करण्याची कार्यवाही ३१ मे २०२६पर्यंत पूर्ण केली जाईल. तोपर्यंत महानगरपालिकेमार्फत पश्चिम बाजूची सर्व कामे केली जातील. मात्र, पूर्व बाजूची कामे पूर्ण करण्यासाठी सुमारे ३० ते ४५ दिवसांचा कालावधी लागेल. म्हणजेच १५ जुलै २०२६ पूर्वी या उड्डाणपुलाची सर्व कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले.
तटकरे प्रदेश कार्यालयात, दादांच्या प्रतिमेला नमन; खुर्चीसमोर नतमस्तक होताना भावुक!
विद्याविहार पूल
मुंबई ‘एन’ वॉर्डच्या हद्दीत, घाटकोपर परिसरात पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडण्यासाठी विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या रुळांवरून जाणारा उड्डाणपूल ( Vidyavihar Flyover ) महापालिकेच्या पूल विभागाच्या वतीने उभारण्यात येत आहे. या उड्डाणपूल प्रकल्पामध्ये रेल्वे रुळांवरून जाणारा सुमारे १०० मीटर लांबीचा मुख्य पूल समाविष्ट आहे. लालबहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा हा उड्डाणपूल एकूण दोन मार्गिकांचा आहे. एकूण ६५० मीटर लांबीच्या या प्रकल्पात रेल्वे रुळांवर १०० मीटर पूल, तर पूर्व बाजूस २२० मीटर आणि पश्चिम बाजूला ३३० मीटर पोहोच मार्ग बांधण्यात येत आहे.