रामदास कदम यांनी उपस्थित केलेले तांत्रिक प्रश्न
रामदास कदम म्हणाले की, “अजित पवार राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री होते. आणि जेव्हा अशा उपमुख्यमंत्री यांच्या विमानाचा अपघात होतो तेव्हा त्या अपघाताची चौकशी झालीच पाहिजे.” ते पुढे म्हणाले, “त्या अपघाताचे फुटेज पाहिलं तर, लँडिंग होताना ते विमान धावपट्टीवर न येता तिरके झाल्याचं दिसतंय. ते विमान धावपट्टीवर आलं नाही, त्याचा आवाज वेगळा येत होता. मग नेमकं पायलटला अडचण काय होती? याबाबत सखोल चौकशी झाली पाहिजे.”
‘विमान प्रवास असुरक्षित वाटण्याची भीती’
याबाबत चौकशी होऊन सत्य समोर आलं नाही तर विमान असुरक्षिततेच साधन आहे असा समज होईल. यात अधिक स्पष्टता यायला पाहिजे. अन्यथा यापुढे कोणता मंत्री विमानाने प्रवास करणार नाही अशी स्थिती होईल असे रामदास कदम म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भीषण विमान अपघात प्रकरणात एअरक्राफ्ट अॅक्सिडन्ट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने चौकशी सुरू केली असल्याचे उत्तर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राला दिले आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्सही ताब्यात घेण्यात आला असल्याचे त्यांनी कळवले आहे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका कशामुळे घडला आणि त्याच्या कारणांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी फडणवीसांनी पत्रातून केली होती.
विमान वाहतूक मंत्र्यांचे आश्वासन
अजित पवार विमान अपघाताच्या चौकशीबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी आश्वासन दिले आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले की, “ही चौकशी केवळ तांत्रिक नसेल तर ती पूर्णपणे पारदर्शक आणि आमची जबाबदारी ओळखून केली जाईल. तपासादरम्यान महाराष्ट्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असून, चौकशी पूर्ण होताच त्याचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला सोपवण्यात येईल, अशी ग्वाही देखील नायडू यांनी दिली आहे.”