• Mon. Sep 14th, 2026

अजित पवारांच्या शब्दपूर्तीसाठी शरद पवार पुन्हा सक्रिय; दु:ख बाजूला सारुन महत्त्वाचा प्रश्न हाती

ByMH LIVE NEWS

Jan 30, 2026
अजित पवारांच्या शब्दपूर्तीसाठी शरद पवार पुन्हा सक्रिय; दु:ख बाजूला सारुन महत्त्वाचा प्रश्न हाती
बारामती 
राज्याच्या राजकारणात कायम सक्रिय आणि निर्णायक भूमिका बजावणारे नेते म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र या दुःखद घटनेनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.आपल्या मुलासमान असलेल्या पुतण्याच्या निधनाचे गहिरे दुःख उराशी बाळगत शरद पवार यांनी आज अजित पवार यांचा सावडण्याचा विधी पार पाडला. हा विधी अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. मात्र या दुःखातून त्यांनी स्वत:ला सावरले. त्यांनी थेट जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देत नीरा नदीच्या प्रदूषणाची प्रत्यक्ष पाहणी केली.

नीरा नदीच्या प्रदूषणाबाबत अजित पवार यांनी हृयात असताना गांभीर्याने लक्ष घातले होते. खाजगी कारखान्यांतून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे नीरा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाले होते. काही दिवसांपूर्वी या प्रदूषणामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती.

या घटनेमुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनी हा गंभीर प्रकार थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या कानावर घातला होता. यावेळी अजित पवार यांनी शेतकऱ्यांना नीरा नदी प्रदूषणमुक्त करण्याचे ठाम आश्वासन दिले होते.

अजित पवार यांच्या निधनानंतर “आता या प्रश्नाकडे कोण लक्ष देणार?” असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, शरद पवार यांनी आज स्वतः नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी करत अजित पवारांचा शब्द पूर्ण करण्याचा निर्धार दाखवला आहे. पाहणीदरम्यान शरद पवार यांनी नीरा नदीकाठच्या नागरिकांशी आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. शेतकऱ्यांच्या समस्या, प्रदूषणामुळे शेतीवर होणारे परिणाम, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली.

या पाहणीदरम्यान शरद पवार यांनी संबंधित यंत्रणांना प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या खाजगी कारखान्यांची चौकशी करून कडक कारवाईचे संकेत दिल्याची चर्चा आहे. नीरा नदीचे पाणी शुद्ध करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी नागरिकांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed