• Sat. Mar 7th, 2026
    आता काँग्रेस-वंचितची मदत घ्यावीच लागणार, शिवसेना-भाजपपुढे मोठा पेच, आकड्यांनी सगळा गेमच पालटला

    Ulhasnagar Municipal Election Result : उल्हासनगर महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप या दोन्ही पक्षांना समसमान ३७ जागा मिळाल्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला समसमान म्हणजे प्रत्येकी ३७ जागा मिळाल्या आहेत. मात्र या पालिकेत सत्तेची सूत्रे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या हाती गेल्याचे दिसत आहे. वंचित आणि काँग्रेसचे एकूण तीन उमेदवार निवडून आले असून, भाजप आणि शिवसेनेला तेवढ्याच जागा सत्तास्थापनेसाठी आवश्यक आहेत.

    मतमोजणीच्या सुरुवातीपासून शिवसेना, भाजप यांच्यात अटीतटीची लढाई सुरू होती. निकालाअंती ३८ जागांवर विजय मिळवत भाजप मोठा पक्ष ठरला. मात्र संध्याकाळी साई पक्षाच्या एका उमेदवाराच्या पुनर्मोजणीत भाजप उमेदवाराचा पराभव करत शिवसेना-साई युतीच्या उमेदवाराने विजय मिळवला. त्यामुळे शिवसेना, भाजप या दोन्ही पक्षांना समसमान ३७ जागा मिळाल्या.

    उल्हासनगर महापालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेना, भाजप यांच्यात एकमेकाचे उमेदवार पळवण्यावरून राजकारण तापले होते. त्यात शिवसेनेने टीओके, साई आणि आरपीआय आठवले गटासोबत युती करत भाजपला एकटे पाडले होते. तसेच एकूण ७८ जागांचा आणि शिवसेनेसोबत असलेल्या घटकपक्षांचा आकडा पाहता भाजपसोबत जागावाटपात युती होणे अशक्य होते. त्यामुळे भाजपविरोधात शिवसेना युती ही लढत रंगली होती.
    Maharashtra TimesBMC Election 2026 : शिवसेनेला नाकारुन भाजपचा महापौर, शिंदेंनी काय मिळवलं? ठाकरेंच्या शिलेदाराचे सात घणाघाती प्रश्न, तिसरा सवाल थेट…
    भाजपमधील पहिल्या फळीतील महत्त्वाचे नेतेही शिवसेना, टीओकेने गळाला लावत भाजपच्या विरोधातच रिंगणात उतरवले. त्यामुळे शिवसेना टीओके, साई युतीची ताकद पाहता या निवडणुकीत भाजप एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले होते.

    मात्र भाजपने वापरलेले प्रचारतंत्र तसेच शिवसेना युतीतील काही घटक पक्षांबाबत असलेली मतदारांची नाराजी, शिवसेनेतील अंतर्गत स्थानिक नेत्यांच्या प्रभागातील तिकीट वाटपातील कुरघोड्या, बंडखोरी याचा फटका शिवसेना युतीला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

    अल्पमतदानाचा इतिहास असलेल्या उल्हासनगर महापालिका निवडणुकीत २०१७ च्या तुलनेत अधिक म्हणजे ५२.१० टक्के मतदान झाले. त्यामुळे वाढीव मतांचा टक्का कुणासाठी लाभदायक ठरतो याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मतमोजणीच्या सुरुवातीला भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होती. मतमोजणी पुढे सरकताच भाजपने अनेक प्रभागात आघाडी घेत शिवसेना युतीला अनपेक्षित धक्का दिले. मात्र तीन वाजल्यानंतर शिवसेनेनेही आपल्या बालेकील्ल्यात विजयाची मालिका सुरू ठेवत महत्त्वाच्या पॅनलवर विजय मिळवला.
    Maharashtra TimesBMC Election 2026 : …तर मुंबईत ठाकरेंनी भाजपला जेरीस आणलं असतं, तो ‘हात’ ठरला असता मदतीचा, मग कसा बदलला खेळ?
    भाजप २५, शिवसेना २४ असा अटीतटीचा सामना सुरू होता. त्यानंतरही अखेरच्या फेरीपर्यंत दोन्ही पक्षांच्या विजयी उमेदवारांची चुरशीची रंगत सुरूच होती. अखेर भाजप ३८ जागांवर विजय मिळवत मोठा भाऊ ठरल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तर तीन पक्षांना सोबत घेऊन आणि ७८ जागा लढवूनही शिवसेनेला ३६ जागांवर समाधान मानावे लागले. तर प्रभाग क्रमांक ४, १० व २० मधील अंतर्गत कलह शिवसेनेच्या सहा जागांच्या पराभवाला आणि भाजपच्या विजयाला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजपचा आत्मविश्वास बळावला.

    अखेर संध्याकाळी साडेपाचला प्रभाग क्रमांक १६ अ मधील भाजप उमेदवार पवन वाघ यांच्याविरुद्ध असलेल्या साई पक्षाच्या दीप्ती दुधानी यांनी पुनर्मोजणीची मागणी केली. त्यात दीप्ती यांचा ७४ मतांनी विजय झाला.

    BJP victory in BMC : विकास, मराठी माणूस, मॅनेजमेंट आणि प्लानिंग. भाजपनं अशी जिंकली मुंबई

    प्रभाग १८ मधील वंचितचे सुरेश सोनवणे, विकास खरात या दोन उमेदवारांनी तसेच, प्रभाग १८ मधूनच काँग्रेसच्या अंजली साळवे यांनी विजय मिळवत सत्तास्थापनेसाठीची सूत्रे आपल्या हाती ठेवली आहेत. बहुमतासाठी ३९ जागा आवश्यक असल्याने भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष या तिघांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा