• Fri. Mar 6th, 2026

    Nashik-Bengaluru Flights : नाशिक-बेंगळुरू विमानसेवेला अचानक थांबा, प्रवाशांसह पर्यटन-उद्योग क्षेत्राला जबरदस्त फटका; कारण काय?

    Nashik-Bengaluru Flights : नाशिक-बेंगळुरू विमानसेवेला अचानक थांबा, प्रवाशांसह पर्यटन-उद्योग क्षेत्राला जबरदस्त फटका; कारण काय?

    Nashik-Bengaluru Flight Service Cancelled : नाशिक-बेंगळुरू विमानसेवा रद्द करण्यात आली असून यामुळे पर्यटनासह, उद्योग क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक : ‘इंडिगो’ने विमान वाहतुकीतील गोंधळ दूर करण्यासाठी सध्याच्या वेळापत्रकात बदल केले असून, नाशिक-बेंगळुरू विमानसेवा तूर्त रद्द करण्यात आली आहे. येत्या 10 फेब्रुवारीनंतर ही सेवा पूर्ववत होण्याची चिन्हे असली, तरी सध्या पर्यटन व उद्योग क्षेत्राला याचा मोठा फटका बसणार आहे.

    ओझर विमानतळावरून सध्या ‘इंडिगो’च्या वतीने नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, नागपूर, इंदूर, गोवा आदी ठिकाणांसाठी विमानसेवा कार्यान्वित आहे. नाशिक-बेंगळुरू सेवाही सुरू होती व तिला उत्तम प्रतिसाद लाभत होता. बेंगळुरू हे उद्योग-व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र असून, अनेक आयटी कंपन्यांची मुख्यालये बेंगळुरूत आहेत. याशिवाय पर्यटनाच्या दृष्टीनेही हे शहर महत्त्वाचे असून, दक्षिण भारतात जाण्यासाठी बेंगळुरू विमानसेवा महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे पर्यटक व उद्योजकांच्या मागणीनुसार दररोजसाठी नाशिक-बेंगळुरू विमान सुरू करण्यात आले होते.

    बेंगळुरू येथून दुपारी 1.20 वाजता उड्डाण घेतलेले विमान नाशिकला 3.10 वाजता पोहोचत असे, तर नाशिक येथून दुपारी 3.40 वाजता भरारी घेतलेले विमान बेंगळुरूला सायंकाळी 5.30 वाजता पोहोचत असे. मात्र, गेल्या महिन्याच्या प्रारंभी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या वतीने विमान कंपन्यांसाठी वैमानिक थकव्याविषयी नवे नियम लागू करण्यात आले. त्यानुसार वैमानिकांना विशिष्ट तास विश्रांती देणे सक्तीचे झाले. त्यामुळे ‘इंडिगो’च्या विमान वाहतुकीचे नियोजन कोलमडले.

    अनेक विमाने रद्द होऊन प्रवाशांचे हाल झाले. त्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने ‘इंडिगो’ला 10 फेब्रुवारीपर्यंत फेरनियोजनाची मुदत दिली आहे. त्यामुळे ‘इंडिगो’ने अनेक देशांतर्गत विमानोड्डाणे रद्द केली असून, नाशिक-बेंगळुरू विमानालाही फटका बसला आहे. हे विमान 10 फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आले असून, त्यानंतरही सुरू होण्याबाबत साशंकता आहे.

    प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर संचलन व अन्य कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा भाग ‘नो फ्लाय झोन’ घोषित करण्यात आला असून, सकाळची विमाने रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे येत्या 19 ते 27 जानेवारी दरम्यान नाशिक-नवी दिल्ली दरम्यानची सकाळची विमानसेवा बंद राहणार आहे. दिल्लीची रात्रीची विमानसेवा मात्र सुरू राहील.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा