• Sat. Mar 14th, 2026
    आम्ही एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण… राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट, ‘सामना’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंसमोर म्हणाले…

    Uddhav Thackeray Raj Thackeray Saamana Interview : ठाकरे बंधूंच्या युतीचा दिवस उजाडण्यासाठी महाराष्ट्राला 20 वर्षे वाट का पहावी लागली? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला

    उद्धव ठाकरे राज ठाकरे मुलाखत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘सामना’साठी संयुक्त मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याची परिस्थिती, मराठी माणसाचे अस्तित्व, मुंबईचे प्रश्न आणि आगामी महापालिका निवडणुका यावर सविस्तर चर्चा केली. खासदार संजय राऊत आणि अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर मुलाखतकारा होते.

    मुलाखतीत संजय राऊत यांनी विचारलं की “महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता, 20 वर्षांनंतर आपण दोघे ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबई, मराठी माणूस आणि महाराष्ट्रावर चर्चा करत आहात, पण हा दिवस उजाडण्यासाठी महाराष्ट्राला 20 वर्षे वाट का पहावी लागली?”

    यावर राज ठाकरे म्हणाले, की “काही गोष्टी का घडतात, कशा घडल्या, काय झालं? हे आज आता सोडून दिलं पाहिजे. महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत मी सांगितलं होतं की, कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज संकट महाराष्ट्रावर आहे, मुंबईवर आहे, महाराष्ट्रातील अनेक शहरांवर आहे. हे संकट काय आहे हे मराठी माणसाला समजलेलं आहे. काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे याची जाणीव त्याला आहे. ही एकच गोष्ट आम्ही एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे.”
    Maharashtra TimesVirendra Tandel : मनसेला माहिममध्ये पुन्हा हादरा, माजी नगरसेवकाने साथ सोडली, राज ठाकरेंना पत्र लिहित म्हणाला, मनात तीव्र अस्वस्थता…
    राज ठाकरे पुढे म्हणाले, की “आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाही. महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. या विषयावर अनेक वर्षे मी बोलतोय, उद्धवही बोलतोय. आज अशा एका वळणावर ही निवडणूक आणि महाराष्ट्र उभा आहे, ज्याला आपण ‘अभी नही तो कभी नही’ म्हणतो तशा वळणावर. तशी परिस्थिती मुंबईवर, ठाण्यावर येऊन ठेपलेली आहे. खरं तर एमएमआर रिजनवर येऊन ठेपलेली आहे. एमएमआर रिजन मी मुद्दाम बोलतोय. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. आज एकत्र नाही आलो आणि आज एकजुटीने सामना नाही केला तर मला असं वाटतं, महाराष्ट्र आम्हाला माफ नाही करणार!”
    Maharashtra TimesPune News : ही त्या 20 उमेदवारांची यादी, पुणे पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांना नावं सुपूर्द, प्रशासन अलर्ट, काय कारण?
    उद्धव ठाकरे म्हणाले की, “खरं तर, आम्ही दोन भाऊ एकत्र आलो हा भावनिक मुद्दा आहे. पण दोन भाऊ एकत्र आले याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसानं एकत्र आलं पाहिजे. महाराष्ट्र वाचवायचा असेल तर आपल्याला एकजूट दाखवावीच लागेल. पक्ष, राजकीय मतं वेगळी असतील, पण आपण मराठी आहोत. महाराष्ट्र आपला आहे आणि आपण जर एकमेकांमध्ये वेगळ्या चुली मांडल्या, तर महाराष्ट्र तोडणारे त्यांची पोळी भाजून जातील.”

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा