Parcel Service Shut Down : पश्चिम रेल्वेच्या स्थानकातील पार्सल सेवा बंद करण्यात आली आहे. अचानक झालेल्या या बंदमुळे व्यावसायिक, व्यापाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
स्थानिकांमध्ये संतापाची लाट
पालघर, बोईसर, डहाणू वाणगाव, सफाळा रेल्वे स्थानकातून सुरू असलेली ही रेल्वे पार्सल सेवा गरीब मच्छिमार, फुलविक्रेते, शेतकरी, फळबागातदार, छोटे व्यापारी यांची जीवनवाहिनी आहे. या रेल्वे पार्सल सेवेद्वारे स्वस्त दरात आणि जलदगतीने देशभरातच नव्हे तर जगभरात माल पोहोचवला जात होता. मात्र एका आदेशात ही सेवा बंद करताना त्याचे परिणाम काय होतील, व्यवसायावर किंवा त्यांच्या दररोजच्या कामाला किती फटका बसेल याचा साधा विचारही रेल्वे प्रशासनाने केला नसल्याचा संताप स्थानिक व्यापारी करत आहेत.
Maharashtra weather News : राज्यात तापमानाचा पारा घसरला, विदर्भ, मराठवाड्यात थंडी वाढणार; मुंबईत पुढील 48 तास …
पार्सल सेवेवर मोठी वाहतूक अवलंबून होती, पण सेवा अचानक बंद
पालघर तालुक्यातील माहीम व केळवे येथील विड्याची पाने, केळीचे पाने, वेगवेगळ्या प्रकारची फुले, भाजीपाला, मासे, चिकू गुजरात राज्यातून येणारा मावा, दुग्धजन्य पदार्थांसारखी कृषी उत्पादने, कोंबडी, बकरीसारखी जनावरे आणि मोटरसायकल यांची वाहतूक या पार्सल सेवेवर अवलंबून होती. आता ही सेवा बंद झाल्याने व्यापाऱ्यांना वसई किंवा वापी येथे जाऊन पार्सल पाठवावे लागणार आहे किंवा पार्सल आल्यास घेण्यासाठी जावे लागणार आहे. त्यामुळे वेळ, पैसा आणि कष्टात वाढ होणार आहे.
Kashinath Chaudhary in BJP | पालघर साधू प्रकरणात आरोप आणि भाजपात प्रवेश, नंतर स्थगिती. काय घडलं ?
अल्प उत्पन्नाचं कारण देत पार्सल सेवा बंद
अल्प उत्पन्न हे एकमेव कारण रेल्वे प्रशासनाने दिले असले तरी ही सेवा महत्त्वाची होती. गरिबांचा रोजगार, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि स्थानिक बाजारपेठा कायम सुरू ठेवण्याच्या दृष्टीने ही पार्सल सेवा कार्यरत होती, मात्र महसुलाच्या आकड्यामुळे प्रशासनाला याचे सोयरसुतक नसल्याची टीका होत आहे.
