• Sat. Mar 7th, 2026
    Nagpur Elections Results: महायुतीला ऐतिहासिक विजय, भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष, नागपुरात 35 वर्षांनी पहिल्यांदाच हे घडलं

    Nagpur Local Body Elections: राज्यात आज नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर: महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला असून भारतीय जनता पक्ष हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्राच्या जनतेने भाजप आणि महायुतीला प्रचंड मोठा कौल दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मी यापूर्वीच भाकीत केले होते की एकूण निवडून येणाऱ्या नगराध्यक्षांपैकी किमान 75 टक्के नगराध्यक्ष महायुतीचे असतील. महाराष्ट्राच्या जनतेने तसाच कौल दिला आहे. आतापर्यंत सुमारे 129 नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले असून, महायुती मिळून एकूण नगराध्यक्षांपैकी 75 टक्के प्रतिनिधित्व आमचे आहे. नगरसेवकांच्या बाबतीतही भाजपने विक्रम केला असून सुमारे 3,300 नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत. यावरून पक्षाला मिळालेला प्रचंड जनाधार स्पष्ट होतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या यशाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे अभिनंदन करत त्यांच्या पक्षांनीही उत्कृष्ट कामगिरी केल्याचे सांगितले.
    Maharashtra TimesSolapur Election Results: नाद करायचा नाय! देवा भाऊंच्या पठ्ठ्याने करुन दाखवलं; पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नगरपरिषदेवर भाजपचा विजय
    विधानसभेप्रमाणेच नगरपरिषद निवडणुकांतही महायुतीने चांगला परफॉर्मन्स दिला आहे, असे ते म्हणाले. या निवडणुका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झाले असून, माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्रिमंडळातील सहकारी आणि संघटनेतील नेत्यांनी उत्तम समन्वय साधल्यामुळे हा विजय मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    ब्ल्यू प्रिंट जनतेसमोर मांडला

    2017 च्या तुलनेतही हा विजय अधिक मोठा असून, गेल्या 30-35 वर्षांच्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात असा विजय यापूर्वी कुणालाही मिळाला नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. “या संपूर्ण निवडणुकीत मी पूर्णपणे सकारात्मक प्रचार केला. कोणत्याही व्यक्तीवर, पक्षावर किंवा नेत्यावर टीका न करता केवळ विकासाच्या मुद्द्यावर मत मागितली. आम्ही काय केले आणि पुढे काय करणार आहोत याचा स्पष्ट ब्ल्यू प्रिंट जनतेसमोर मांडला,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय नेतृत्वाच्या सकारात्मकतेचा लाभ महायुतीला मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, मराठवाड्यात पंकजा मुंडे, निलंगेकर, मेघना बोर्डीकर, अतुल सावे, तर विदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रभावी समन्वय साधल्याचा उल्लेख त्यांनी केला. गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली, असे मुख्यमंत्री म्हणाले.

    कामठी नगरपालिकेत 35 वर्षांनंतर भाजपचा नगराध्यक्ष

    नागपूर जिल्ह्यात भाजपला मोठे यश मिळाले असून, कामठी नगरपालिकेत ३५ वर्षांनंतर भाजपचा नगराध्यक्ष निवडून आल्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला. काही ठिकाणी अल्प मतांनी पराभव स्वीकारावा लागला असून, चंद्रपूरसारख्या भागात जिथे अपेक्षित यश मिळाले नाही तिथे कारणांचा अभ्यास करून आगामी महानगरपालिका निवडणुकांत सुधारणा केली जाईल, महानगरपालिका निवडणुकांबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नगरपरिषदांपेक्षा महानगरपालिकांमध्ये महायुतीला आणखी चांगले निकाल मिळतील, असा मला ठाम विश्वास आहे. हा विजय कोणत्याही एका नेत्याचा नसून संपूर्ण टीम भाजप आणि महायुतीच्या संयुक्त नेतृत्वाचा विजय असल्याचे त्यांनी सांगितलं.

    विरोधीपक्ष प्रभावीपणे मैदानात उतरले नाहीत

    तर निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांवर टीका करत ते म्हणाले की, या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांचा विजय निश्चित असल्याचे विरोधी पक्षांच्या नेत्यांना आधीच लक्षात आल्याने ते प्रभावीपणे मैदानात उतरले नाहीत किंवा कमी पडले, असा आरोप त्यांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यातील काही नगरपालिकांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, त्या पराभवांची कारणे शांतपणे तपासली जातील. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियमबद्ध पद्धतीने आढावा घेऊन जिथे कमतरता राहिली आहे ती दूर करण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा