• Wed. Mar 11th, 2026
    खंबाटकी घाटात भीषण अपघात, ट्रकने सात गाड्या चिरडल्या, S आकृती वळणाच्या ब्लॅक स्पॉटवरच घटना

    Khambatki Ghat Accident : वीकेंडची सुट्टी संपल्याने महामार्गावर पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली असतानाच खंबाटकी घाटात हा अपघात झाला

    सातारा अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सातारा : ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरने नवले पुलावर अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना ताजी असतानाच सातारा-पुणे मार्गावर रविवारी रात्री विचित्र अपघात झाला. भरधाव ट्रकने सात चारचाकी वाहनांना धडक दिली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झालेली नसली, तरी काही वाहन चालक किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.

    खंबाटकी घाटातल्या बोगद्यानंतर येणाऱ्या ‘एस’ आकाराच्या वळणावर हा अपघात झाला. अपघातानंतर पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वीकेंडची सुट्टी संपल्याने महामार्गावर पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली असतानाच हा अपघात झाला. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

    कसा झाला अपघात?

    घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खंबाटकी घाटातील बोगद्यातून बाहेर आल्यानंतर साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर अज्ञात ट्रकने सात वाहनांना धडक दिली. खंबाटकी घाटातील एस कॉर्नरवर रविवारी रात्री हा अपघात झाला. सुदैवानं यात कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही चालक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना खंडाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
    Maharashtra TimesNashik Accident : चालक बदलला अन् घात झाला, सप्तशृंगीला जाताना एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, इनोव्हा 700 फूट खोल दरीत, मोबाईलच्या…
    सातारा-पुणे मार्गावरल खंबाटकी घाटात असलेला एस कॉर्नर हा अपघाताचा ब्लॅक स्पॉट आहे. यापूर्वी याठिकाणी अनेक भीषण अपघात झाले आहेत. रविवारी रात्री पुन्हा या ठिकाणी भीषण अपघात झाला. या अपघातानंतर मालट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले होते. मात्र, खंडाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के यांच्या पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

    ट्रॅक्टर चालकाचा अपघातात जळून मृत्यू

    दुसरीकडे, पुण्यात ऊस वाहतूक करणारा ट्रक आणि ट्रॅक्टर यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांनी पेट घेतला. त्यामुळे ट्रॅक्टर चालकाचा जागीच जळून मृत्यू झाला.
    Maharashtra TimesStudent Death : तुमचा मुलगा… शाळेतून फोन, सशाच्या काळजाने बाप पोहोचला, तोवर सगळं संपलेलं; 11 वर्षांच्या लेकराचा मृत्यू, कारण हादरवणारं
    हा अपघात भिगवण-बारामती रस्त्यावरील पिंपळे (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. अमोल राजू कुराडे (वय ३०, रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे या अपघातात मृत झालेल्या ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे. ऊस हंगाम सुरू झाल्यापासून या परिसरातील हा चौथा बळी आहे. अपघातानंतर मृत चालकाचा जळून कोळसा झाला होता. ट्रकचालक फरारी झाला आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा