• Sat. Mar 7th, 2026
    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा संसदेत तापला, सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, अखेर केंद्रीय कृषीमंत्री म्हणाले….

    अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून केंद्राची मदत कधी मिळणार हा प्रश्न अजून अनुत्तरीतच आहे. एनडीआरएफ नियमांनुसार केंद्राची मदत मिळण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्तावच पाठवला की नाही, यावरुन गोंधळ पाहायला मिळतो आहे, पण केंदीय कृषी मंत्र्यांनी आता…

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर: राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याच्या प्रक्रियेत राज्य सरकारकडून गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा आरोप केला जात आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी एनडीआरएफच्या नियमांनुसार मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्तावच न पाठविल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाचे राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी महाराष्ट्र सरकारकडून नुकसानीबाबत दिलेली माहिती नमूद केली आहे पण, अधिकृत मदत मागणीचा प्रस्ताव आलेला नाही, असे लेखी उत्तर खासदार ओमराजे निंबाळकरांना दिल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, यावर केंद्रीय कृषीमंत्र्यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, ‘महाराष्ट्र राज्य सरकारने 27 नोव्हेंबरला केंद्राला मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे.’

    दरम्यान, केंद्रीय कृषीमंत्री मंत्री शिवराज सिंह यांनी संसदेत दिलेल्या स्पष्टीकरणानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत भूमिका मांडली. त्या म्हणाल्या ‘कृषी मंत्री राज्य सरकारला वाचवत आहेत. मी राज्याच्या कृषीमंत्र्यांशी बोलले त्यांनी सांगितलं की सध्या सर्व्हे सुरु आहे. त्याचा रिपोर्ट एक कमिटी तयार करणार आहे. जी कमिटी पुन्हा अंतिम अहवाल तयार करणार आहे. त्यानंतर हा अहवाल केंद्राकडे जाईल’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    Maharashtra TimesMumbai News: ‘रुद्र’ कुठे आहे? ‘शक्ती’च्या संशयास्पद मृत्यूनंतर राणीच्या बागेतील दुसरा वाघ गायब, व्याघ्रप्रेमींना घातपाताचा संशय, नेमकं चाललंय तरी काय?

    यानंतर अहिल्यानगरमघील शेतकरी संघटना आक्रमक

    दरम्यान, राज्य सरकारच्या या निष्काळजीपणामुळे अहिल्यानगरमध्ये संतापाची लाट उसळली असून अनेक शेतकरी संघटनांनी सरकारविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असताना मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे न पाठविणे ही शेतकरीविरोधी भूमिका असल्याची टीका होत आहे. इतिहासात नोंद राहील अशी अतिवृष्टी झाली, परंतु सरकारची संवेदनाच हरवल्यासारखी आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.

    राज्यातील आर्थिक, सामाजिक परिस्थिती डळमळीत असताना चुकीच्या कृषी धोरणांमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे. राज्यात शेतकऱ्यांचा आक्रोश वाढत असताना मुख्यमंत्री प्रस्ताव पाठवला असे सांगतात, तर केंद्रीय मंत्री प्रस्ताव प्राप्त झालेला नाही असे स्पष्टपणे म्हणत असल्याने प्रशासनातल्या विसंगतीचे चित्र अधिक ठसठशीतपणे पुढे आले आहे.

    अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत मिळावी म्हणून राज्य सरकारने तत्काळ सुधारित प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा, अन्यथा आंदोलनाची हाक द्यावी लागेल, असा इशारा अहिल्यानगर मधील शेतकरी संघटनेचे बच्चू मोडवे यांनी दिला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा