कल्याण-डोंबिवलीत सशस्त्र गुंडांची दहशत, खंबाळपाड्यातील भोईरवाडीतून दोघांच्या आवळल्या मुसक्या, टिळकनगर पोलिसांची कारवाई; नेमकं काय घडलं?
या छाप्यात पोलिसांनी कोयते, तलवारी, छऱ्याची बंदूक आणि छरे असा मोठा शस्त्रसाठा हस्तगत केला. तसेच घटनास्थळावरून दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
Mumbai News: ‘रुद्र’ कुठे आहे? ‘शक्ती’च्या संशयास्पद मृत्यूनंतर राणीच्या बागेतील दुसरा वाघ गायब, व्याघ्रप्रेमींना घातपाताचा संशय, नेमकं चाललंय तरी काय?
गुंडांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात हवालदार बाबुराव हांडे यांच्या फिर्यादीवरून रवी मोहन शिंदे (२७, रा. विशाल चाळ, खंबाळपाडा), अन्झार अब्दुल कयुम शेख (२५, रा. अन्सारी चाळ, भोईरवाडी), आकाश अशोक शेलार आणि अतिश उर्फ मोन्टी अशोक शेलार या चार जणांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम व भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पकडलेल्यांमध्ये रवी शिंदे आणि अन्झार शेख यांचा समावेश असून त्यांना रंगेहात अटक करण्यात आली.
छतावरून उड्या मारून पळ काढला
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस पथकाने शेडमध्ये प्रवेश केला असता, तेथील चारही जण पोलिसांना पाहताच पळू लागले. त्यापैकी दोघे लाकडी शिडीवरून छतावर गेले आणि उड्या मारून पळून जाण्यात यशस्वी झाले. हवालदार बाबुराव हांडे व परशुराम वैद्य यांनी पाठलाग करून दोघांना पकडले.
पकडलेल्या आरोपींकडून शस्त्रसाठ्याबाबत चौकशी करण्यात येत असून ही शस्त्रे कुठून आणली, त्यांचा वापर कोणत्या गुन्हेगारी हेतूसाठी होणार होता याचा तपास सुरू आहे. तसेच फरार आकाश शेलार आणि अतिश शेलार यांचा शोध सुरू आहे. दरम्यान घटनास्थळी उपस्थित असताना गुंडांनी अन्य व्यक्तींना शिवीगाळ व जीवंत ठेवण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गुंडांना लगाम घालण्याचे आव्हान
आगामी सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता पोलिसांनी गुंडांविरोधात मोहीम सुरू केली आहे. पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त अतुल झेंडे यांनी गुंड-गुन्हेगारांचे नेटवर्क मोडून काढण्यासाठी पावले उचलली आहेत. अलीकडेच पश्चिम डोंबिवलीतील मोठागाव परिसरात सात जणांच्या टोळीनं एका तरुणावर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले होते. तसेच काही दिवसांपूर्वी कल्याण-मलंगगड रोडवर एका गुंडाने वाहनचालकांना कोयता दाखवत धमकावले होते. त्याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली. गुंडांना पहाटेच ‘शॉक’; पोलिसांची सुपरफास्ट कारवाई, तलवारी–कोयते जप्तशहरात नशामुक्ती अभियान सुरू असताना, आता कोयतेबाज गुंडांनी दहशत निर्माण केली असून त्यांना ताब्यात घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.
