Political News : सत्ताधारी पक्षांमधील कटुता संपवण्यासाठी भाजपचे दिल्लीतील शीर्षस्थ नेतृत्वच महाराष्ट्रातील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मध्यस्थी करणार आहे
राज्यातील नगर परिषदा तसेच नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुतीमधील भाजप आणि शिवसेना या दोन्ही घटक पक्षांतील संघर्ष चव्हाट्यावर आला. वास्तविक ही निवडणूक कार्यकर्त्यांची असली तरी यात नेतेच हातघाईवर आले. त्यातही सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेचे आमदार नीलेश राणे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात आरोप रंगले. भाजपकडून पैसेवाटप सुरू असल्याचे व्हिडीओ चित्रीकरण नीलेश राणेंकडून दाखविण्यात आल्यानंतर, ‘मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे’, अशी इशारेवजा प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली.
त्यानंतर चव्हाण यांनी पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातील सभेत शिवसेनेला लक्ष्य केले. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या भाषणातील, ‘नंबर एक हा नंबर एकच असतो, नंबर दोन याला काही किंमत नसते’, या वक्तव्याचा दाखला देत, ‘जो भली कुछ है देवाभाऊ ही है’ असेही चव्हाण म्हणाल्याने युतीमधील संबंध अधिकच ताणले गेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर थेट दिल्लीतील भाजपचे नेतृत्व मध्यस्थी करणार असल्याची माहिती भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्याने ‘मटा’ला दिली.
Eknath Shinde : जिल्हाधिकाऱ्यांचा ‘तो’ नियम धुडकावणं महागात, एकनाथ शिंदेंच्या जाहीर सभेत फोटोग्राफरवर गुन्हा, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीने जुळवून घेतलं
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र भाजपशी जुळवून घेण्यावरच भर दिला आहे. रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. तीन तारखेनंतर काहीही झाले, तरी आमची राष्ट्रवादी मात्र देवेंद्र फडणवीस आणि ‘एनडीए’च्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुढील महिनाभरात जिल्हा परिषदांच्या आणि त्यानंतर एकप्रकारे मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. महापालिकेतील जागावाटपावरून सुरुवातीपासूनच संघर्ष सुरू असून, आता त्यामध्ये कटुतेची भर पडणार आहे. यामुळे प्रामुख्याने मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पुणे तसेच पिंपरी-चिंचवड या महापालिकांतील जागावाटपावरून भाजप आणि शिवसेनेमधील ठिणगी आगडोंबाला आमंत्रण देण्याची चिन्हे आहेत. त्यातही ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेत वेळीच तोडगा न निघाल्यास येथे भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्षच एकमेकांच्या विरोधात उभे राहणार असल्याचे स्थानिक नेत्यांकडून खासगीत सांगितले जात आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील भाजप तसेच शिवसेनेच्या पक्षनेतृत्वाशी थेट दिल्लीतील भाजपचे शीर्षस्थ नेतृत्व संवाद साधत मध्यस्थी करणार असल्याची माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने ‘मटा’ला दिली. ‘आमच्या पक्षाने केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात भाजपचे जवळपास १७० हून अधिक नगराध्यक्ष विजयी होतील, असा अंदाज आहे.
BMC Election : जानेवारीत अवघड, फेब्रुवारीत बोर्डाच्या परीक्षा, महापालिका निवडणुका कोणत्या महिन्यात? उत्तर आलं समोर
साहजिकच भाजपच मोठा भाऊ असल्याचे विधानसभेनंतर पुन्हा एकदा सिद्ध होईल. मात्र तरीही महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्हाला शिवसेना तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ आवश्यकच आहे. त्यामुळे आमच्या केंद्रातील नेतृत्वाकडून भाजप-शिवसेनेतील संघर्षावर तोडगा काढला जाईल’, असे या मंत्र्याने सांगितले.
