• Fri. Mar 6th, 2026
    बारसं झालं अन् मध्यरात्री बाळाचं अंग गार पडलं, काही मिनिटातच मृत्यूने गाठलं, नार्वेकर कुटुंबावर शोककळा, नेमकं काय घडलं?

    Baby dies on Naming Ceremony Night : बारशाचा कार्यक्रम संपल्यानंतर मध्यरात्री झोपलेल्या बालकाचे अंग पहाटे अचानक थंड पडले आणि त्याच्या नाकातून रक्त येऊ लागलं.

    बारसे (प्रातिनिधिक फोटो)(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रत्नागिरी : बाळाचं बारसं झालं त्याच दिवशी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कोकणात घडली आहे. रत्नागिरी शहरातील नार्वेकर कुटुंबात ही अंगावर शहारे आणणारी घटना घडली. बारशानंतर मध्यरात्रीच्या सुमारास बाळाचे अंग अचानक थंड पडले आणि त्याच्या नाकातून रक्त आले. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे

    रत्नागिरी शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेची खबर बाळाचे वडील अनिकेत प्रमोद नार्वेकर यांनी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिली. ज्या रात्री घरात आनंदोत्सव साजरा झाला, त्याच रात्री एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना रत्नागिरी शहरात घडली आहे.

    बारशाचा कार्यक्रम संपल्यानंतर मध्यरात्री झोपलेल्या बालकाचे अंग पहाटे अचानक थंड पडले आणि त्याच्या नाकातून रक्त आले. पालकांनी अनेक खाजगी रुग्णालयात धाव घेतल्यानंतर त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
    Maharashtra TimesRohit Arya : मुलांना दहा मिनिटे भेटून घ्या, रोहित आर्याचा सकाळी 9.45 ला मेसेज, जळगावच्या शिक्षकाने लेकीला टाटा केलं अन्…
    अनिकेत नार्वेकर यांच्या घरी मंगळवार, २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बारशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नातेवाईकांनी एकत्र येऊन बाळाचे नामकरण ‘नीरव’ असे केले. रात्री बारशाचा कार्यक्रम आनंदात पार पडला. यावेळी बाळ नीरव पूर्णपणे चांगला खेळत होता.

    रात्री २ वाजण्याच्या सुमारास त्याला आईने दूध पाजून त्याला घरातील बेडवर झोपवले आणि त्या शेजारी झोपल्या. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास आईला जाग आली असता, त्यांनी पाहिले की बाळ नीरवचे अंग अचानक थंड पडले होते आणि त्याच्या नाकातून रक्त आलेले होते.

    हा प्रकार पाहून घाबरलेल्या आईने त्वरित कुटुंबातील नातेवाईकांना याची माहिती दिली. कुटुंबीयांनी तत्काळ बाळाला घेऊन प्रथम माळनाका येथील डॉ. सूर्यगंध यांच्याकडे, तेथून परकार हॉस्पिटलमध्ये, आणि त्यानंतर साळवी स्टॉप येथील डॉ. चौधरी यांच्याकडे धाव घेतली. चौधरी हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यावर डॉक्टरांनी बाळाला पुढील उपचारांसाठी तातडीने रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
    Maharashtra TimesPowai studio Hostage Case : रोहितने आडनाव बदलून ‘आर्य’ लावलं, कोथरुडमध्ये वृद्ध आई-वडील राहतात, शेजारी म्हणाले, आम्ही भेटलेलो तेव्हा तो…
    त्यानुसार, बाळ नीरव याला तातडीने रिक्षाने रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणून उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर बाळ नीरव याला पहाटे मृत घोषित केले.

    या अत्यंत दुर्दैवी घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात आ.मृ. क्र. ११३/२०२५, बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा