Solapur Barshi Crime News : बार्शी तालुक्यात ऑनलाईन गेमिंगच्या नादात तरुणाने आपलं आयुष्य संपवलं. कर्जाच्या ओझ्याखाली त्याने स्वत:चं आयुष्य उद्धवस्त केलं. कुटुंबाने एकुलता एक लेक गमावला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
कुसलंब गावात समाधान नानवरे हा ऑनलाईन गेमच्या आहारी गेला होता. गेल्या काही वर्षांपासून मोबाईलवर ‘चक्री गेम’ खेळण्याच्या व्यसनाच्या आहारी गेल्याने तो कर्जात बुडाला होता. या तरुणाने या व्यसनामध्ये मित्र, नातेवाईक आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून मोठ्या रकमेचं कर्ज घेतलं होतं. कुटुंबाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो कोणाचं काहीच ऐकत नव्हता. अखेर कर्जाच्या प्रचंड ओझ्याखाली येत त्याने आपलं जीवन संपवलं. तरुणाने लोखंडी रॉडला गळफास घेत आत्महत्या केली.
भरधाव कारची रिक्षाला जोरदार धडक; वाहनं थेट खड्ड्यात…. भाजीविक्रेत्या महिलेवर काळाचा घाला, कुटुंबाचा मन हेलावणारा आक्रोश
32 वर्षीय तरुणाची पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा दिवाळीसाठी धाराशिव येथील धोकी या गावात येथील माहेरी गेले होते. 23 ऑक्टोबरच्या रात्री समाधानने आपल्या आई आणि बहिणींसोबत जेवण केलं, आई-बहिणीसोबत त्याने गप्पाही मारल्या. त्यानंतर रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तो झोपण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेला. तिथेच त्याने आयुष्य संपवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता त्याची आई स्वयंपाकघरात पाणी गरम करण्यासाठी गेली होती, तेव्हा त्यांना समाधानने लोखंडी रॉडला गळफास लावून घेतल्याचं दिसलं. हे दृष्य पाहताच त्याच्या आईने एकच टाहो फोडला. कुटुंबाच्या किंकाळ्या ऐकून शेजारी धावत आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
महिला कैद्यानं जीवन संपवलं, कुटुंबियांचा कारागृहाबाहेर राडा आणि आक्रोश, काय घडलं?
कुटुंबाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, समाधानने मित्र, नातेवाईक, बँका, वित्तीय संस्था आणि खाजगी सावकारांकडून मोठी कर्ज घेतली होती. याशिवाय त्याने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुनही पैसे उधार घेऊन गेममध्ये गुंतवले होते. कुटुंबाने त्याला अनेकदा ऑनलाईन गेम न खेळण्याचा सल्ला दिला होता. त्याला सतत समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयार नव्हता. गेमच्या व्यसनामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. महत्त्वाची बाब म्हणजे समाधान हाच कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. सहा महिन्यांपूर्वी समाधानच्या वडिलांची हृदय शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे कुटुंब आधीच कर्जात बुडालेलं होतं. त्यांच्या कुटुंबाकडे जमीन किंवा शेती काहीही नव्हतं. अशा परिस्थितीत कर्जाच्या ओझ्याखाली त्याने टोकाचा निर्णय घेतला.

