• Wed. Mar 11th, 2026
    भरधाव कारची रिक्षाला जोरदार धडक; वाहनं थेट खड्ड्यात…. भाजीविक्रेत्या महिलेवर काळाचा घाला, कुटुंबाचा मन हेलावणारा आक्रोश

    Kolhapur Crime News : संकेश्वर-गडहिंग्लज महामार्गावर शेरी ओढ्याजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात कारने प्रवासी रिक्षाला धडक दिली. महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : संकेश्वर-गडहिंग्लज महामार्गावरील शेरी ओढ्यानजिक चारचाकी आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. अपघातात रिक्षातील शेतकरी भाजी विक्रेत्या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी झालेल्या या अपघातात रिक्षा आणि कारमधील मिळून आठ जण जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावणारा होता. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मृत महिलेचं नाव शोभा ढुंडाप्पा जरळी (वय 58, रा. निलजी, ता. गडहिंग्लज) असं असून त्या शेतकरी असून दररोज शेतातील भाजीपाला विक्रीसाठी प्रवासी रिक्षातून गडहिंग्लज बाजारात येत असत. रविवारी दुपारीही त्या भाजी घेऊन शहरात येत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेश्वरकडून गडहिंग्लजकडे येत असलेली रिक्षा (क्रमांक MH09 BA 462) शेरी ओढ्यानजीक आली असता, भरधाव वेगाने मागून आलेल्या वॅगोन आर (क्रमांक MH 09 GO 7648) या कारने रिक्षाला जोराची धडक दिली. धडकेचा जोर एवढा होता की, दोन्ही वाहने रस्त्यालगतच्या खड्यात कोसळली.
    Maharashtra Timesमहिला डॉक्टरच्या हातावरील मजकूर दुसऱ्यानेच लिहिला? आणखी कोणीतरी… बहिणीचा खळबळजनक दावा, प्रकरणात मोठा ट्विस्ट?

    एकूण 8 जण जखमी

    या अपघातात रिक्षातील शोभा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रिक्षाचालक राजेंद्र दुरदुंडी, प्रवासी चंद्रशेखर म्हातोर (वय 50), अजित मोतीलाल मरांडे (वय 23), रामशंकर म्हातोर (वय 53) हे तिघेही झारखंडचे रहिवासी कामगार असून सर्वजण जखमी झाले. तसंच रिक्षामधील आणखी एक प्रवासी मारुती लक्ष्मण किल्लेदार (वय 48, रा. हिटणी) हेही जखमी झाले. चारचाकीतील सुप्रिया विलास बागी (वय 30), शुभांगी कांबळे (वय 28), आणि पवित्रा संभाजी कांबळे (वय 4, तिघेही रा. तनवडी) हे तिघे देखील जखमी झाली आहेत. त्यामुळे या अपघातात एकूण एक जण जागीच ठार, तर आठ जण जखमी झाले आहेत.
    Maharashtra Timesफळ-भाजी खरेदी करताना दोघांकडून अपहरण, अल्पवयीन तरुणीसोबतच्या भयंकर कृत्याने नागपुरात संताप; कुख्यात गुंडाने…

    गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढून तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. दरम्यान, मारुती किल्लेदार यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलीस ठाण्यात चारचाकी चालक संभाजी शशिकांत कांबळे (रा. तनवडी) यांच्याविरुद्ध बेफिकिरीने वाहन चालवल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    जरळी कुटुंबावर संकट

    शोभा जरळी या अल्पभूधारक शेतकरी असून त्या घराचा संपूर्ण खर्च भाजी विक्रीतून भागवत होत्या. त्यांच्या निधनाने कुटुंबाचा आधारच नष्ट झाला आहे. पती, मुलगा व मुलगी असा त्यांचा परिवार आहे. गावातील नागरिकांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

    महायुतीने अख्खं कोल्हापूर जिंकलं, सर्व उमेदवारांना मुंबईला बोलावलं, विशेष चार्टर्ड विमानाने रवाना

    महामार्गावर वाढते वेगाचे सत्र

    संकेश्वर–गडहिंग्लज हा राष्ट्रीय महामार्ग झाल्याने या मार्गावरील वाहनांची गर्दी आणि वाहनांचा वेग दोन्हीही वाढले आहेत. त्यामुळे मागील काही महिन्यांत या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांनी वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांनी या ठिकाणी गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा