• Sat. Mar 7th, 2026

    Mumbai News: ‘ब्ल्यू फ्लॅग’साठी आजपासून सुरक्षा ऑडिट; तीन समुद्रकिनाऱ्यांची प्रक्रिया पूर्ण

    Mumbai News: ‘ब्ल्यू फ्लॅग’साठी आजपासून सुरक्षा ऑडिट; तीन समुद्रकिनाऱ्यांची प्रक्रिया पूर्ण

    Mumbai News: पाच समुद्रकिनाऱ्यांपैकी लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षा ऑडिटची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता उर्वरित दोन समुद्रकिनाऱ्यांच्या ऑडिटची प्रक्रिया सुरू होणार आहे.

    ‘ब्ल्यू फ्लॅग’साठी समुद्रकिनाऱ्यांचे सुरक्षा ऑडिट.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘ब्ल्यू फ्लॅग’साठी प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर या समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षा ऑडिटची प्रक्रिया सुरू आहे. तीन समुद्रकिनाऱ्यांचे ऑडिट पूर्ण झाले असून, दोघांची प्रक्रिया आज, सोमवारपासून सुरू होणार आहे.

    राज्यातील लाडघर, गुहागर, श्रीवर्धन, नागाव आणि पर्णका (डहाणू ) या पाच समुद्रकिनाऱ्यांची निवड ‘ब्ल्यू फ्लॅग’साठी करण्यात आली आहे. त्यानुसार या समुद्रकिनाऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर ब्ल्यू फ्लॅगचा दर्जा ही देण्यात आला आहे. मात्र, ‘ब्ल्यू फ्लॅग’च्या अंतिम नामांकनासाठी या पाचही समुद्रकिनाऱ्यांचे सुरक्षा ऑडिट होणे गरजेचे आहे. त्यानुसार काही दिवसांपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारपासून नागाव बीचचे सुरक्षा ऑडिट केले जाणार असून, त्यानंतर ३० ऑक्टोबरपासून पर्णका (डहाणू ) या समुद्रकिनाऱ्याचे सुरक्षा ऑडिट सुरू केले जाणार असल्याचे समजते.
    Maharashtra TimesCyclone Montha Alert: सावधान, मोंथा चक्रीवादळ येत आहे! हवामान विभागाकडून ‘या’ दोन राज्यांत रेड अलर्ट, शाळांनाही सुट्टी जाहीर
    या सुरक्षा ऑडिटमध्ये या समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येते. यात प्रामुख्याने सेफ स्विमिंग झोन निश्चित करून त्यांचे मार्किंग करण्याचे काम केले जाते. याशिवाय या समुद्रकिनाऱ्यांवर पुरेशा जीवरक्षकांची नेमणूक करणे, समुद्रकिनाऱ्याजवळ पोहोचण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा आहेत का आदीबाबी तपासण्यात येतात.
    Maharashtra TimesTejashwi Yadav: सत्तेवर आल्यास ‘वक्फ कायदा’ कचरापेटीत; बिहारमध्ये प्रचारसभेत तेजस्वी यादव यांचे विधान
    जूनमध्ये अंतिम नामांकन ?
    या पाचही समुद्रकिनाऱ्यांचे सुरक्षा ऑडिट पूर्ण झाल्यानंतर ‘ब्ल्यू फ्लॅग’च्या अंतिम नामांकनाचा प्रवास सुरू होणार आहे. सुरक्षा ऑडिटचा अहवाल पूर्ण केल्यानंतर साधारण जून-जुलै महिन्यात यासंदर्भातील अंतिम घोषणा केली जाऊ शकते.

    महिनाअखेरपर्यंत पाऊसमारा कायम
    या महिनाअखेर म्हणजे ३० ऑक्टोबरपर्यंत राज्यभर पाऊसमारा कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा