• Thu. Mar 12th, 2026
    कर्ज काढून शेत पिकवलं, पण पावसाने केला घात; लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच शेतकरी महिलेनं मृत्यूला कवटाळलं

    Farmer Ends Life: विदर्भात चार शेतकऱ्यांनी दिवाळी सणादरम्यान जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या घटनांमुळे नागरिकांचा सरकारविरुद्ध रोष वाढू लागला आहे.

    farmer ends life1(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    बुलढाणा: आधीच नापिकी, त्यातच कर्जाचा वाढता बोझा आणि अतिवृष्टीने उद्ध्वस्त केलेली पिके, यामुळे हताश झालेल्या बुलढाणा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे गुरुवारी समोर आले. यात एका शेतकरी महिलेचाही समावेश आहे.

    बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी येथील शिवाजी माणिकराव बुरकुल (६५) यांनी २१ ऑक्टोबरला विषारी औषध प्राशन केले. बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने मुलांनी शेतात जावून पाहिले असता ही घटना निदर्शनास आली. बुलढाणा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना २२ ऑक्टोबरला दुपारी त्यांचा मृत्यू झाला. बुरकुल यांच्यावर एका खासगी पतसंस्थेचे तीन लाखांचे कर्ज होते. कर्ज वसुलीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. सततची नापिकी, वाढते कर्ज आणि अतिवृष्टी अशा तिहेरी पेचात सापडल्याने कर्ज कसे भरणार, या विवंचनेतच बुरकुल यांनी मृत्यूला कवटाळले.
    Maharashtra Timesविदर्भाला दिवाळी भेट; मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा, कोट्यवधींचा खर्च करणार

    शेतकरी महिलेने घेतला गळफास
    बँकेचे कर्ज काढून खरिपात सोयाबीनची लागवड केली. पीक आल्यानंतर कर्ज फेडू या आशेवर असतानाच अतिवृष्टीने घात केला. आता कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असलेल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जावरा मोळवण येथील माला महादेव मेश्राम (५२) या शेतकरी महिलेने आत्महत्या केली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी आठ वाजता ही घटना घडली.

    पाच दिवसांत पाच घटना
    यवतमाळ जिल्ह्याच्या केळापूर तालुक्यातील सुसुरी येथील रवी मोतिराम गेडाम (४०) यांनी गुरुवारी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. मागील पाच दिवसांतील जिल्ह्यातील ही पाचवी शेतकरी आत्महत्या आहे. रवी यांची पत्नी मुलांना घेऊन भाऊबीजेसाठी माहेरी गेली होती. लहान भाऊ भीमरावला दाराची कडी आतमधून लावलेली दिसल्याने त्यांनी आवाज दिला. प्रतिसाद न मिळाल्याने शेजारच्या मदतीने त्यांनी दार तोडले.रवी घरात गळफास लावल्याचे दिसून आले.
    Maharashtra Timesमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य: ‘शहरी नक्षलवाद हे नव्या युगातील सर्वात मोठं आव्हान, तर काँग्रेस अल्ट्रा लेफ्टिस्ट विचारांनी ग्रस्त’
    अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील निंभी येथे एका शेतकऱ्याने मंगळवारी; दिवाळीच्या दिवशी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. राहुल यशवंत छापाने, असे त्यांचे नाव आहे. त्यांच्याकडे सहा एकर शेत आहे. खरीपात त्यांनी सोयाबीनची लागवड केली. अतिवृष्टीमुळे यातून लागवड खर्चही निघणे कठीण झाले. कर्ज कसे फेडणार या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा