• Sat. Mar 14th, 2026
    राज ठाकरेंच्या दीपोत्सवाचं श्रेय फडणवीस सरकार लाटतंय? पर्यटन विभागाच्या पोस्टमुळे मनसेचा संताप

    Raj Thackeray MNS Shivaji Park Deepotsav : दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हते, अशा शब्दात मनसेच्या अधिकृत एक्स अकाऊण्टवरुन संताप व्यक्त केला आहे

    मनसे दीपोत्सव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी दिवाळीत छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे साजरा होणाऱ्या Deepotsav वरुन श्रेयवाद होण्याची चिन्हं आहेत. कारण महाराष्ट्र पर्यटन विभागाने सोशल मीडियावर ‘दीपोत्सवाची’ काही क्षणचित्रं दाखवून मुंबईबाहेरील पर्यटकांना आवाहन केलं आहे. दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हते, अशा शब्दात मनसेच्या अधिकृत एक्स अकाऊण्टवरुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांना टॅग करुन प्रश्न विचारण्यात आले आहेत.

    गेल्याच आठवड्यात राज ठाकरे यांचे बंधू आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सहकुटुंब उपस्थितीत दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. यावेळी ठाकरे बंधूंमधील एकी आणि दोन्ही कुटुंबांमधील एकोपा पाहायला मिळाला होता.

    मनसे अधिकृतची पोस्ट काय?

    “महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्यांच्या एक्स हॅण्डलवरुन मुंबईतील शिवाजी पार्क मैदान येथील ‘दीपोत्सवाची’ काही क्षणचित्रं दाखवून पुढे हा अनुभव घ्यायला या, असं मुंबई आणि मुंबईबाहेरील पर्यटकांना आवाहन केलं आहे. दिवाळी हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण आहे. या सणाच्या निमित्ताने गेली १३ वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजी पार्क मैदानावर दीपोत्सव करत आहे. हा दीपोत्सव जरी मनसे करत असली तरी तो पूर्ण अराजकीय राहील हे आम्ही पाहिलं, आणि आमचा उद्देश फक्त आणि फक्त लोकांना आनंद मिळावा हाच आहे आणि राहील” असं मनसेने सोशल मीडियावर लिहिलं आहे.
    Maharashtra TimesThane News : अंबरनाथमध्ये हार्ट अटॅकने महिलेचा मृत्यू, शिंदेंच्या सोहळ्याला रुग्णवाहिका नेल्याने उपलब्ध न झाल्याचा आरोप
    “जेव्हा महाराष्ट्र सरकारचा एक विभाग या दीपोत्सवाचं मार्केटिंग हे स्वतः हा विभाग आयोजित करत असल्यासारखं दाखवतं, तेव्हा विशेष आश्चर्य वाटलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचं अगदी छोटंसं श्रेय दिलं असतं तर निश्चित आम्हाला आनंद झाला असता, सरकारच्या मनाचा उमदेपणाही दिसला असता. परंतु नाशिकमध्येही जे मनसेने केलं, ते पुढे तत्कालीन सरकारनेच केलं अशी जाहिरातबाजी झाली. तुमचे नेते ते आमचे नेते, तुमचा पक्ष आमचा पक्ष अशी कार्यपद्धती सत्ताधारी पक्षाची आहे हे दिसतंच आहे. पण आता दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हतं!” अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे.
    Maharashtra TimesPune News : व्हॉट्सअप ग्रुप पाहिला नाही का? पुण्यात भाजप नेत्यांमधला ऑनलाईन वाद पोहचला थेट पोलीस स्टेशनात
    “आम्ही मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एक अभिजात कार्यक्रम यावर्षी केला होता, दीपोत्सव तर असतोच, पण असे सामान्यांना आनंद देणारे अनेक उपक्रम आम्ही करत राहणार आहोतच. त्यावेळी देखील पर्यटन विभागाला ते आमचे आहेत म्हणण्याचा मोह होईल इतके ते छान करु, फक्त त्यावेळेस त्याचं श्रेय आमच्या पक्षाला जरूर द्या म्हणजे झालं!” असा टोलाही सरकारला लगावण्यात आला आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा