• Sun. Mar 8th, 2026
    आक्रमक मराठा आंदोलकांचा घेराव; विखे पाटील म्हणाले, “सरकारचा GR फसवा नाही, पण…”

    Maratha Reservation: छत्रपती संभाजीनगर येथे मराठा आंदोलकांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना घेराव घातला आणि हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबतच्या शासन निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर कुणबी प्रमाणपत्र काढण्यातील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन विखे पाटील यांनी दिलं आहे.

    आक्रमक मराठा आंदोलकांचा घेराव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    छत्रपती संभाजीनगर : “हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत राज्य सरकारने काढलेला शासन निर्णय (जीआर) फसवा आहे. गेल्या दीड महिन्यात कोणतीही प्रशासकीय प्रक्रिया झाली नाही,” असा आरोप करत मराठा आंदोलकांनी शुक्रवारी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण पाटील यांना घेराव घातला. कुणबी प्रमाणपत्र काढण्यातील त्रुटी दूर करण्याचं आश्वासन यावेळी विखे यांनी आंदोलकांना दिलं आहे.

    मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात 88 व्या नियामक मंडळाच्या बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आले होते. विखे पाटील थांबलेल्या खासगी हॉटेलजवळ त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पैठण येथील विदूर लगडे यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी विखे यांना अडवत मराठा आरक्षणाचे काय झाले, अशी विचारणा केली. 2 सप्टेंबरच्या जीआरमधून समाजाला काय मिळाले ? असा सवाल करत कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसमिती स्थापन करण्यात आलेल्या नाहीत. अंतरवाली सराटी गावातसुद्धा ग्रामसमिती स्थापन नाही. जीआर काढून दीड महिना उलटलेला असूनही प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू नाही, असा आरोप आंदोलकांनी केला.

    “तुमच्या भावनांशी सहमत आहे. यंत्रणेत त्रुटी दिसत आहेत. पण, जीआर फसवा नाही. त्रुटी दूर करण्यासाठी ऑनलाइन बैठक बोलावली आहे. सरकार म्हणून भूमिका घेतलेली आहे. काही जण प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी नक्की होईल. कुणीही गैरसमज बाळगू नये,” असे विखे म्हणाले. त्यानंतर राधाकृष्ण विखे राहुरी येथे रवाना झाले.

    दरम्यान, “विखे पाटील यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. 2 सप्टेंबर रोजीचा मराठा आरक्षणाचा जीआर फसवा आहे,” असं सांगत आंदोलकांनी हॉटेल परिसरात जीआर फाडत निषेध नोंदवला.

    आरक्षणाला धक्का नाही
    राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओबीसी मेळाव्यावर भाष्य करणं टाळलं. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात दावे दाखल आहेत. सरकार न्यायालयात भूमिका मांडणार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, ही भूमिका कायम आहे. छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा करू, असं विखे म्हणाले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा