Ahilyanagar Crime: अहिल्यानगरमध्ये कॉलेज तरुणीवर चाकूने हल्ला झाला असून भिस्तबाग महाल परिसरात ही घटना शनिवारी घडली. आरोपी महेश भेटे याने मुलीच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा लाथ मारून उघडल्याने मुलीचा जीव वाचला असून जखमी मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन लक्ष्मण पोटे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून शनिवारी 11 वाजता त्यांच्या घरामागील खोलीतून आरडाओरड होत असल्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी पाहिले असता महेश भेटे हा आपल्या रूममध्ये एका मुलीच्या अंगावर बसून हातातील धारदार चाकूने तिच्या गळ्यावर वार करत होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीचे दृश्य पाहून शेजारी राहणारे नागरिकही भयभीत झाले.
दसऱ्यानिमित्त आईसाठी दागिन घ्यायला गेले अन्…; व्यावसायिकासोबत धक्कादायक प्रकार, घटनेचे CCTV फुटेज समोर
अल्पवयीन मुलीचा जीव वाचवण्यासाठी दरवाजा लाथ मारून उघडला!
फिर्यादी सचिन पोटे यांनी तत्काळ रूममालकाला फोन केला आणि दोघांनी मिळून दरवाजा लाथ मारून उघडला. त्यानंतर जखमी मुलगी रक्तस्त्राव होत असताना बाहेर आली आणि हातवारे करत रस्त्याकडे धावली. तिच्या मागे चाकू हातात घेऊन महेश भेटे हाही धावत आला. सुदैवाने नागरिकांनी तत्परतेने हस्तक्षेप केला आणि अल्पवयीन मुलीचा जीव वाचवला.
नेमकं रूममध्ये काय घडलं?
सदर मुलगी अकरावी इयत्तेत शिकत असून ती घटनेपूर्वी आरोपीसोबत दुचाकीवरून रूमवर गेल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. रूममध्ये गेल्यानंतर त्यांच्यात नेमका कोणत्या कारणातून वाद झाला, हे अद्याप अस्पष्ट आहे. परंतु काही वेळातच आरोपी भेटे याने चाकूने मुलीच्या गळ्यावर सपासप वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. जखमी मुलीला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
आरोपी महेश भेटे हा सध्या जामिनावर बाहेर
आरोपी महेश भेटे हा यापूर्वीच खुनाच्या गुन्ह्यात अटकेत होता आणि सध्या जामिनावर तुरुंगातून बाहेर आहे. जामिनावर असतानाच त्याने अल्पवयीन मुलीवर हल्ला केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पोलिस काय म्हणाले?
अल्पवयीन मुलीवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख पटली असून त्याचा शोध सुरू आहे. हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मुलगी शुद्धीवर आल्यानंतर संपूर्ण प्रकार उघड होईल, असं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, या घटनेने अहिल्यानगर हादरले असून पुन्हा एकदा जामिनावर सुटलेल्या आरोपींच्या हालचालींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

