Maharashtra Weather Update: पालघर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने रविवार वाहतूक बंद ठप्प झाली होती. जवळपास ७० ते ८० हून अधिक गावांमधील नागरिकांना अनेक ठिकाणी अडकून पडावे लागले होते.
मुंबईमध्ये शनिवारी रात्री उशिरा पावसाची तीव्रता वाढली आणि याचा सर्वाधिक फटका दक्षिण मुंबईला बसला. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी पश्चिम विदर्भाजवळ असल्याने महाराष्ट्रामध्ये त्यातही प्रामुख्याने कोकण विभागात याचा प्रभाव अधिक होता. कुलाबा येथे रविवारी सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या कालावधीत ९३.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझ येथे ५४.७ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. आज, सोमवारी या क्षेत्राची तीव्रता थोडी कमी होण्याचा अंदाज आहे. सोमवारी महामुंबई परिसर, पालघर जिल्हा; तसेच रायगड जिल्ह्याला ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे.
तेलबियांची नासाडी; अतिवृष्टीमुळे ८६ कोटी किलो सोयाबीनला फटका बसल्याचा अंदाज
मुंबईमध्ये शनिवारी सकाळी ८.३० ते रात्री ८.३०पर्यंत कुलाबा येथे ९.६, तर सांताक्रूझ येथे ११.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर रात्री मेघगर्जनेसह वीज आणि पावसाचा जोर वाढला. रात्रभर पडलेल्या पावसामुळे कुलाबा येथे रविवारी सकाळी ८.३०पर्यंत १२०.८ मिलीमीटर, तर सांताक्रूझ येथे ८३.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर रविवारी दिवसभर कायम राहिला. त्यामुळे कुलाबा येथे मुसळधार पावसाची नोंद झाली. मुंबईसोबतच डहाणू, माथेरान येथेही शनिवारी आणि रविवारी पावसाचा जोर कायम होता. डहाणू येथे रविवारी सकाळी ८.३०पर्यंत १३१, जव्हार येथे ११४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर पालघर कृषी केंद्रावर १८४ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. रायगड जिल्ह्यात माणगाव येथे १०२, माथेरान येथे ८४.२ मिलीमीटर पाऊस रविवारी सकाळी ८.३०पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदला गेला.
Maharashtra Flood: राज्यात पूरसंकट गडद; मराठवाड्यापाठोपाठ नाशिकमध्येही अतिवृष्टी, पाच जणांचा मृत्यू
मुंबईत पाणी साचले नाही
शनिवारपासून मुंबईत सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई महापालिकेची यंत्रणाही कार्यरत होती. पर्जन्य जलवाहिन्या, घनकचरा व्यवस्थापन कर्मचारी, अभियंते, पंप चालक, आपत्कालीन पथके इत्यादी कर्मचारी, कामगार वॉर्डस्तरावर कार्यरत होते, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. दिवसभरात मुंबईत कोणत्याही भागात पाणी साचल्याची घटना घडली नाही. तसेच दरड कोसळण्याच्याही घटना घडल्या नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. फक्त पावसामुळे अंधेरी सब-वे काही वेळासाठी बंद करण्यात आला. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.

