Jalna News: जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे गणेश विसर्जनाच्या दिवशी दुर्दैवी घटना घडली असून १४ वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. अभिषेक गिराम असं सदर मुलाचे नाव असून, तो गणेश मंडळाच्या सजावटीसाठी वायर जोडत असताना ही घटना घडली. यामुळे तीर्थपुरी गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घनसावंगी तालुक्यात शनिवारी सकाळपासूनच गणपती मिरवणुकीची सगळीकडे जोरदार तयारी सुरू होती. यावेळी प्रत्येक गणेश मंडळ आपल्या गणरायाची सजावट आणि मिरवणुकीसाठी लागणाऱ्या वस्तूंची जुळवाजुळव करत होते. त्यामुळे सगळे तरुण आपल्या कामात व्यस्त होते. मात्र अभिषेक हा देखील आपल्या गणपती सजावटीदरम्यान वायर जोडण्याची तयारी करत होता. मागील काही दिवसांपासून पावसाने देखील चांगलीच हजेी लावली होती. त्यामुळे जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाला होता. त्यातच अभिषेक हा साऊंडचे वायर जोडत होता. नेमके करंट असणारी वायर देखील तिथेच होती. त्यामुळे साऊंड आणि करंटची वायर यामधील फरक न समजल्यामुळे त्याने करंटची वायर हातात पकडली आणि त्यामध्ये त्याला विजेचा धक्का बसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यावेळी विजेच्या धक्क्याने अभिषेकचा जागीच मृत्यू झाला.
अभिषेक हा ज्ञानदेव गिराम यांचा एकुलता एक मुलगा होता. आता अचानक अभिषेकचाही विजेच्या शॉकमुळे मृत्यू झाल्याने गिराम कुटुंबावर आभाळ कोसळल्यासारखी वेळ ओढावली आहे. या घटनेनंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील सर्वच नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
दरम्यान, या दुर्घटनेबद्दल सर्वत्र तीव्र दुःख व्यक्त होत असून, ऐन गणपती विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे विजेचे काम करताना सर्वांनीच खबरदारी घेणे गरजेचे आहे, तसेच लहान बालकांनी व युवकांकडे कुटुंबातील व्यक्तीने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

