• Fri. Mar 6th, 2026
    Lieutnant Success Story : कोल्हापुरच्या लेकीची देशपातळीवर भरारी, जवान पतीच्या निधनानंतर लेफ्टनंट पदाला गवसणी

    Lieutnant Success Story : कोल्हापूरच्या प्रियंका खोत यांनी दुःख बाजूला सारून सैन्यात लेफ्टनंट पद मिळवले. चेन्नई येथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांचे पती निलेश खोत यांचे निधन झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ प्रियंका सैन्यात भरती झाल्या. गावी परतल्यावर ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. प्रियंकाने या यशाचे श्रेय कुटुंबाला दिले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : कोल्हापूरच्या प्रियांका निलेश खोत या तरुणीने वैयक्तिक दुःखावर मात करत आपल्या जिद्दीतून भारतीय सैन्यात अधिकारीपद मिळवले आहे. चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (OTA) येथे झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये प्रियांका ह्यांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नेमणूक मिळाली. हा क्षण केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरला आहे.

    प्रियांका या स्वर्गीय नाईक निलेश खोत यांच्या पत्नी आहेत. निलेश खोत भारतीय सैन्यात सिग्नल्स कॉर्प्समध्ये कार्यरत होते. 2022 साली अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे अकाली निधन झाले होते. तर त्याच्या फक्त दीड महिना आधी निलेश यांनी वडिलांना गमावले होते. अल्पावधीत घडलेल्या या दुहेरी आघातामुळे खोत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र या संकटामुळे खचून न जाता प्रियांका यांनी पतीच्या स्मृती जपण्यासाठीच सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता आणि आता जिद्दीने प्रयत्न करुन त्यांनी आपलं ध्येय साध्य केलं आहे.

    चेन्नईमध्ये पार पडलेल्या या पासिंग आऊट परेडमध्ये प्रियांका यांच्यासह एकूण 130 ऑफिसर कॅडेट्सनी शॉर्ट सर्व्हिस कमिशनचे प्रशिक्षण पूर्ण केले, ज्यामध्ये 25 महिला समाविष्ट होत्या. परमेश्वरन ड्रिल स्क्वेअर येथे झालेल्या या सोहळ्याला सैन्याचे वरिष्ठ अधिकारी, प्रशिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    लेफ्टनंट पदाची नेमणूक मिळाल्यानंतर प्रियांका खोत आपल्या गावी तारदाळ (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे परतल्या असता गावकऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. गावातील प्रमुख मार्गावरून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. प्रियांकाच्या या परतीच्या क्षणाला गावाने सामाजिक सोहळ्याचे स्वरूप दिले. मिरवणुकीनंतर त्यांचा औपचारिक सत्कार गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला. गावची सून अशा पद्धतीने सैन्यात अधिकारी झाली याचा अभिमान गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. “तारदाळचे नाव देशपातळीवर पोहचवले, हा आमच्यासाठी गौरवाचा क्षण आहे,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.

    गावकऱ्यांनी सत्कार केल्यानंतर आपले मत मांडताना प्रियंका यांनी सांगितले की, “आज मला ऑर्डनन्समध्ये नियुक्ती मिळाली आहे. हा क्षण माझ्या आणि कुटुंबासाठी अत्यंत खास आहे. पती सैन्यात असतानाच मला सैन्याबद्दल ओढ लागली होती. तर पतीच्या निधनानंतर माझी कुटुंबाकडून मला खंबीर आधार मिळाला आणि त्यातूनच सैन्यात जाण्याची प्रेरणा मिळाली.” पतीसोबतचे सहजीवन आणि त्यानंतरही त्यांचा मनाला सततचा मिळत असलेला पाठिंबा, हेच आपल्याला आशीर्वाद आणि प्रत्येकवेळी प्रेरणादायी ठरले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तर “आर्मी म्हणजे केवळ नोकरी किंवा प्रोफेशन नाही, तर तो जीवनाचा मार्ग आहे. आपल्या मुला मुलींना मोठ्या क्षेत्रात करावी घेण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्यातील कौशल्य ओळखा आणि त्यांना प्रोत्साहन द्या. प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता बाळगा. मुला मुलींना पडणाऱ्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरे द्या.” असे प्रियांका यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले आहे.

    दरम्यान पतीचे निधन, कुटुंबीयांना आधार देण्याची जबाबदारी आणि स्वतःच्या सैनिकी कारकिर्दीचे स्वप्न यांचा संगम साधत प्रियांकाने आज लेफ्टनंट म्हणून नवा प्रवास सुरू केला आहे. एकेकाळी वैयक्तिक वेदनेतून गेलेल्या या तरुणीने आज संपूर्ण परिसरातील महिलांसाठी प्रेरणेचा दीप प्रज्वलित केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साध्या शेतकरी कुटुंबातून बाहेर पडून प्रियांकाने सैन्यात मिळवलेले यश इतर तरुण विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. भारतीय सैन्याच्या गणवेशातील त्यांची नवी ओळख ही केवळ वैयक्तिक अभिमानापुरती मर्यादित न राहता, संपूर्ण जिल्हा आणि राज्याच्या नावलौकिकात भर घालणारी ठरली आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा