Raigad Rain : रायगडमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, पण रायगडमध्ये शाळा सुरू असल्याने पालक नाराज आहेत. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर आहेत. महाडमध्ये पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
रायगड जिल्हा प्रशासन मात्र ढिम्म?
रेड अलर्ट जारी केला असूनही मुसळधार पावसाने कुंडलिका, आंबा, सावित्री या नद्यांनी थोक्याची पातळी ओलांडली आहे. तर पाताळगंगा, उल्हास, गाढी नद्या दुथडी भरून वाहत असते. डोंगर-नाले ओसंडून वाहत असताना शाळा, कॉलेज, महाविद्यालय बंद करण्याचा कोणताही निर्णय प्रशासनाने घेतलेला नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
मराठवाड्याला पावसाचा मार; पाच जिल्ह्यांना झोडपले, दोन महिलांचा मृत्यू, कुठे-कशी परिस्थिती? जाणून घ्या…
गेल्या चार दिवसांपासून मार तालुक्यात तुफान पाऊस पडत आहे आज पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढला असून सर्व दूर पाऊस पडत आहे. महाड तालुक्यातील किल्ले रायगड आणि करमर खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुफान पाऊस बरसात असल्याने सांदोषी गावाला जाणाऱ्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली असून सांदोसी आणि बावळे गावाला जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे जवळपास या दोन गावांचा महाड तालुक्याचे संपर्क तुटला आहे. काल नदीला प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी आल्याने बिरवाडी मधील आसनपोई कुंभारवाडा मार्गे बिरवाडीत जाणारा मार्ग काल नदीच्या पाण्यामुळे वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तर ठरवली ठिकाणी सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या बांधाऱ्यावरून पाणी जात असल्याने बिरवाडी परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. काल नदीच्या पाण्यामुळे महाड शहराला देखील याचा धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.म्हसळा तालुक्यातील ढोरजे नदी पुलावरून सकाळी ८ वाजल्यापासून पाणी वाहत आहे. म्हसळा शहरातील बाजारपेठमध्ये पावसाचे पाणी साचले असल्याने नागरिकांची दैना उडाली. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग तालुक्यातील धोकवडे नंबर २ येथे पूरस्थिती झाली की, जीव धोक्यात घेऊन येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. याठिकाणी १२ ते १४ घरे आहेत. कमीत कमी ८० ते ९० माणसांचं वास्तव्य आहे. प्रशासनाला एवढे वर्ष विनंती करुन सांगून सुद्धा लक्ष दिले जात नाही.
आमच्या गावातील सरपंच किंवा इतर राजकीय लक्ष द्यायला तयार नाही आहे, असे येथील काही नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील मुरुड राजपुरी दरम्यान असणाऱ्या रस्त्यावर लगतच्या डोंगरातून भला मोठा दगड आल्याने काही काळ मोठ्या वाहनाची वाहतूक बंद करण्यात आली होती.
रोहा तालुक्यातील कुंडलिका महिसदरा या नद्या तुडूंब दुथडी भरून वाहत असून डोंगर दऱ्यातून वाहणारे नाले देखील पावसामुळे भरून वाहत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या कोलाड आंबेवाडी नाक्यावरील मार्गावर तसेच बाजारात पुराचे पाणी शिरल्याने या पावसाचा फटका दुकानदारांना बसला आहे.
पालकांचा सवाल, ‘मुंबईला सुट्टी, रायगडला का नाही?’
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून मुंबईत प्रशासनाने संवेदनशील निर्णय घेतला. मात्र रायगड जिल्ह्यातील प्रशासनाने अजूनही कोणताही आदेश जारी केलेला नाही. यामुळे अनेक शाळा आणि महाविद्यालयांत विद्यार्थी पावसात प्रवास करत आहेत. मुसळधार पावसात वाहतूक ठप्प, नद्या-नाले तुडुंब अशा परिस्थितीत शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय पालकांच्या पचनी पडलेला नाही.
सोशल मीडियावर संताप
#RaigadRain #SchoolHoliday #RedAlert अशा हॅशटॅगसह अनेक पालक सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत. “मुंबईला सुट्टी मिळते, रायगडच्या विद्यार्थ्यांचे काय?” असा प्रश्न मोठ्या प्रमाणावर विचारला जात आहे. ‘आवश्यकता असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे’ असा सल्ला प्रशासन देत असताना, विद्यार्थ्यांना मात्र शाळा-कॉलेजला जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

