• Fri. Jun 19th, 2026
    Girish Mahajan: संजय राऊत मानवी बॉम्ब! गिरीश महाजनांचा हल्लाबोल; नगरसेवकही सोडून जाण्याचा केला दावा

    Girish Mahajan On Sanjay Raut: विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने नाशिकमध्ये आल्यानंतर महाजन यांनी गुरुवारी (दि.१८) माध्यमांशी संवाद साधला.

    गिरीश महाजन संजय राऊत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामुळेच त्यांच्या पक्षाचे जास्त नुकसान झाले आहे. यांना आवरा असे प्रत्येक वेळी सांगितले, तरीही उद्धव ठाकरे आम्हाला सोडून गेले अन् आता औटघटकेचे राजा बनले. राऊत हे मानवी बॉम्ब असून, ठाकरेंनी तो गळ्यात बांधून घेतला आहे, या शब्दात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांना आमदार, खासदार वैतागले असून, आता मुंबई महापालिकेतील नगरेसवकसुद्धा ‘जय महाराष्ट्र’ करतील. लोक त्यांच्या पक्षात राहायला तयार नाहीत, असा दावाही महाजन यांनी केला.

    ‘उद्धव ठाकरे गटातील खासदार फुटीनंतर संजय राऊत यांनी ‘राडा’ करण्याचे आवाहन केले. त्यावर ‘राडा’ करायला कोणीही शिल्लक राहिलेले नाही. ते दिवस गेले, जेव्हा तुम्ही आमच्यासोबत होता. आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसला आहात. राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी मागे-मागे फिरता,’ अशी टीका महाजन यांनी केली.

    हिंमत असेल तर आडवे या, संजय राऊतांवर बोचरी टीका; शिंदेंच्या खासदाराचा ठाकरेसेनेवर हल्लाबोल

    ‘ठाकरे गटातील लोक ‘ग्राउंड’वर कुठे आहेत, राऊतांना त्यांचेच लोक, आमदार वैतागले आहेत. मुंबई महापालिकेतील नगरेसवकसुद्धा ‘जय महाराष्ट्र’ करतील. ‘उबाठा’ने लोकांना वाऱ्यावर सोडले आहे. ज्यांना रहायचे त्यांनी रहा, ज्यांना जायचे त्यांनी जा, असे त्यांना सांगतात. पक्ष चालवण्याची ही कुठली पद्धत झाली? तुमची बडबड ऐकण्यासाठी लोकांना थांबयचेय तरी कुठे,’ असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला. ‘भाजपकडून पैसे, ईडी आणि ईव्हीएमचा वापर करीत असल्याचा आरोप विरोधक करतात. परंतु, ते वस्तुस्थिती स्वीकारायला तयार नाहीत. खासदारांची संख्या वाढल्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांची ताकद वाढली असली तरी, महायुतीचीच ताकद वाढणार आहे. त्यामुळे वाईट वाटायचे कारण नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

    Maharashtra TimesShiv Sena UBT Split : ‘धगधगता अग्नी चहूकडे अन् मार्ग निखाऱ्यांचा’; 6 वेळा फुटलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचा इतिहास
    ‘शिंदेंकडून त्रागा नाही’
    ‘या निवडणुकीत नगरसेवकांवर अविश्वासाचा प्रश्न नाही. परंतु, निवडणुकीत काळजी घ्यावी लागते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठेही त्रागा केला नाही. त्यांनी नगरसेवकांना कडक शब्दात बोलावे लागले,’ असेही महाजन यांनी मान्य केले. ‘प्रत्येक निवडणूक आम्ही गांभीर्याने घेतो. कार्यकर्त्यांसाठी आम्हाला यावे लागते. कार्यकर्ते आमच्यासाठी मेहनत घेतात, त्यांना वाऱ्यावर कसे सोडायचे? आमच्याकडे ही पद्धत नाही. ज्यांच्याकडे ही पद्धत आहे, त्यांची काय अवस्था झाली आपण पाहत आहात,’ असे महाजन म्हणाले. ‘आम्हाला अधिक मतदान होणार आहे. कार्यकर्ते आमच्यासाठी मेहनत घेतात. एकदिवस आम्ही त्यांना जाऊन भेटलो तर काय झाले? असे ते म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा