Nitesh Rane : आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार घडामोडी सुरु आहेत. या निवडणुका महायुतीमधील घटक पक्ष एकत्र सामोरं जाणार, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. पण मंत्री नितेश राणे यांनी कोकणात स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
जिल्हा नियोजन मंडळातून कमी निधी दिला जातो, असा आरोप विनय नातू करतात. यावर नितेश राणे यांनी भूमिका मांडली. “आता आमच्याकडे आमदार नाहीत म्हणून आम्हाला कमीच समजलं जातं. मात्र आम्ही स्वबळाची ताकद दाखवू तेव्हा हे सगळं थांबेल”, अशा शब्दात नितेश राणे यांनी भूमिका मांडली.
मंत्री उदय सामंतांवर व्यक्त केली नाराजी
“लोकसभेला खासदार हे भाजपाचे आमचे आहेत. ते आमच्या कार्यकर्त्यांनी निवडून आणले आहेत. त्यावेळेला काय परिस्थिती होती हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, असं नितेश राणे म्हणाले. यावेळी नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मतदारसंघातील निधी वाटप करताना आमदार किरण सामंत यांना 20 कोटी, स्वतः मंत्री उदय सामंत यांना 20 कोटी, आमदार शेखर निकम यांना 20 कोटी तर भाजपचे खासदार म्हणून नारायण राणे यांना फक्त 5 कोटी दिलेले आहेत. हे थांबणार कधी? जिल्हा नियोजनमध्ये आम्हाला आमची लोकं पाहिजेत. तेव्हाच हे थांबेल”, अशा शब्दांत नितेश राणे यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
“आज कोकणातला कोणताही मतदारसंघ असा नाही की जो भारतीय जनता पार्टीच्या ताकदीशिवाय निवडून येऊ शकत नाही. आमचा निधी हवा असेल तर नातूसाहेबांनी मांडलेली विस्तृत भूमिका यासाठी आम्ही आमची ताकद दाखवणार. जिल्हा परिषद पंचायत समिती स्वबळावर लढवून तुम्हालाही आमची ताकद किती आहे ते दाखवण्याची संधी तरी द्या अशी आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. हातचं राखून किती वर्ष ठेवायचं. त्यामुळे याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढण्याची भावना आणि त्यांची मागणी आपण प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगा. त्या दृष्टीने मी ही भावना नेते मंडळीकडे पोहोचविन”, अशी भूमिका नितेश राणे यांनी मांडली आहे.
नितेश राणेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर
लोकशाही न्यायालयाच्या उंबरठ्यावर तडफडत आहे, या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. “त्यांच्या मनाप्रमाणे काही घडलं नाही म्हणजे असं काही होत नाही. ठाकरेंचं हे बोलणं शेंबड्या मुलांसारखं झालं. माझ्या मनाप्रमाणे झालं नाही म्हणजे तिथे लोकशाही मेली. ज्या वेळेला लोकसभेचे खासदार निवडून आले त्यावेळेला लोकशाही जिवंत होती आणि पण आता विधानसभेला हरलो न्यायालयामध्ये निर्णय आमच्या मनाविरुद्ध गेला म्हणजे सगळं वाईट. हे शेंबड्या मुलांचे लक्षण आहे”, अशा शब्दात नितेश राणे यांनी टीका केली.
मुंबईतून कोकणात येण्यासाठी सुरू होणारी रो रो सर्विस केवळ गणेशउत्सवासाठी नाही तर ती कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यात अल्ट्राटेक येथे बोट थांबवण्याची तयारी सुरू आहे. देवगड विजयदुर्ग येथे ही ही फेरीबोट सेवा असेल अशी माहिती त्यांनी दिली.
ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे माजी आमदार विनय नातू आणि शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्यावर केलेली टीका आणि मांडलेली भूमिका या प्रश्नावर ते म्हणाले की, तीच भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे का? हे उद्धव ठाकरे यांनी एकदा जाहीर करावं. मग बघू. आगामी निवडणुकांमध्ये याचे कसे पडसाद पडतात ते कळेल, असाही इशारा नितेश राणे यांनी दिला.

