• Thu. Jun 18th, 2026

    मराठी-हिंदीचा वाद पोहोचला पंढरपूरच्या विठुरायाच्या दरबारात, काय घडलं?

    मराठी-हिंदीचा वाद पोहोचला पंढरपूरच्या विठुरायाच्या दरबारात, काय घडलं?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    Pandharpur News : मराठी-हिंदी भाषेचा वाद आता महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत पोहोचला आहे. इथे तुलसी पूजा हिंदी भाषेत करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सोलापूर : राज्यातील मराठी आणि हिंदीचा वाद आता थेट पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरापर्यंत पोहोचला आहे. कारण पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात चक्क हिंदीत पूजा घातल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे 30 ते 35 कुटुंब हे मराठी असताना केवळ एका कुटुंबासाठी हिंदीत पूजा घातल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत राहुल सातपुते नावाच्या एका व्यक्तीने ट्विट केलं आहे. राहुल सातपुते यांनी पंढरपूर मंदिर समितीकडे तक्रार केल्याची माहिती ‘टीव्ही 9 मराठी’ने दिली आहे. या प्रकरणी चौकशी करुन योग्य कारवाई करु. तसेच यापुढे मराठीतच मंदिरात पूजा केली जाईल, असं मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिल्याचं वृत्त आहे.

    राहुल सातपुते यांनी काय आरोप केले आहेत?

    “पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतर्फे तुलसी अर्चन पूजेचे आयोजन केले जाते. याच पंढरपूरमधील तुलसी अर्चन पूजेचा अनुभव राहुल सातपुते यांनी शेअर केला आहे. ही पूजा हिंदीत करण्यात आल्याचा आरोप राहुल सातपुते यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या आद्य दैवताच्या दरबारात देखील हिंदी सक्ती झालीय का?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. “माझ्या कुटुंबाने या पूजेत सहभाग घेतलेला. समितीच्या तुकाराम भुवनात साधारण 30 ते 35 कुटुंब पूजेसाठी जमलेली होती. समितीतर्फे एक गुरुजी स्टेजवर बसून सर्वांना सूचनांच्या माध्यमातून पूजा घडवत होते. सुरुवातील सूचना मराठीत दिल्या. तेवढ्यात ह्या 30 ते 35 कुटुंबांपैकी एक कुटुंब म्हणाले की त्यांना मराठी कळत नाही म्हणून हिंदीत पूजा घ्यावी. यानंतर गुरुजींनी लगेच हसत हसत होकार देत संपूर्ण पूजा हिंदीत सुरु केली”, असा आरोप राहुल सातपुते यांनी केला.

    “आपण महाराष्ट्रात आहोत. आमच्या कुटुंबाला हिंदी कळत नाही. महाराष्ट्राची राजभाषा मराठी कळते. त्यामुळे कृपया मराठी भाषेत सूचना द्या. पण यावर गुरुजी माझ्यावर चिडले आणि माईकवरुन म्हणाले, या माणासाचा काय विषय आहे? सिक्युरिटी आणि समितीवाले इकडे या आणि या माणसाशी बोला. त्याशिवाय पुढे पूजा सुरु करता येणार नाही, असं म्हणून त्यांनी माईक बंद केला”, असा आरोप राहुल सातपुते यांनी केला.