Rakshabandhan 2025: रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर टपाल विभागात ‘आयटी २.०’ प्रणालीमुळे गोंधळ उडाला आहे. सर्व्हरच्या मंद गतीमुळे पोस्ट कार्यालयांमध्ये लांब रांगा लागल्या आहेत, ज्यामुळे राखी पाठवणाऱ्या भगिनींना तासन्तास तिष्ठत उभे राहावे लागत आहे. उपनगरीय कार्यालयांमध्ये ‘सर्व्हर डाउन’ असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
उपनगरीय पोस्ट कार्यालयांमध्ये तर थेट ‘सर्व्हर डाउन’च्या सूचनाच खिडक्यांवर टांगत ठेवून ती सर्व गर्दी जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ)कडे वळविण्यात आली आहे. परिणामी सशाच्या गतीने सेवा देण्याचा संकल्प करणाऱ्या, तसेच रक्षाबंधनासाठी विशेष लिफाफ्याची अन् नारळी पौर्णिमेच्या दिवशीच राखी देण्याची सक्त सूचना देणाऱ्या टपाल विभागाच्या राखी अन् स्पीड पोस्ट सेवेवर तांत्रिक अडसरामुळे कासवगतीचा शिक्का बसला आहे. ‘रक्षाबंधन केवळ उत्सव नाही, तर भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्यातील प्रेम अन् विश्वासाचे ते प्रतीक आहे,’ अशी उद्घोषणा करीत डाक विभागाने यंदा रक्षाबंधनासाठी ‘विशेष लिफाफा’अवघ्या बारा रुपयांमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे.
Rakshabandhan 2025 : राखी बांधताना तीन गाठी का बांधाव्यात? याचा त्रिदेवांशी संबंध आहे का? जाणून घ्या कारण
या लिफाफ्याशिवाय तिकीट चिकटवून साध्या लिफाफ्याचीही सुविधा भगिनींसाठी उपलब्ध आहे. यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी किंवा एखादा दिवस अगोदर वा नंतर अशा तीन प्रमुख दिवसांमध्ये भगिनींच्या राख्या घरोघर पोहोचविण्याच्या विशेष सूचना डाक विभागाच्या केंद्रीय कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. घराघरांमध्ये टपाल वितरित करणाऱ्या पोस्टमन विभागासह आरएमएस सेवा (रेल्वे मेल सर्व्हिस)सारख्या विभागांनाही याबद्दल विशेषत्त्वाने सांगण्यात आलेले आहे.
शिवसैनिकांनी कृषिमंत्र्यांना पत्ते दाखवले, राष्ट्रवादीकडून कोकाटेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
पोस्टाची रांग की कुरिअरचा पर्याय
नाशिक विभागतील सर्व टपाल कार्यालयांमध्ये ‘एपीटी ॲप्लिकेशन’ची विकसित केलेली प्रणाली ४ ऑगस्टपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. भविष्यात टपाल विभागाचे कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. त्यासाठी २ ऑगस्ट रोजी शहरातील सर्व पोस्ट कार्यालयांमधील सार्वजनिक व्यवहार बंद होते. त्यानंतर या व्यवहारांना सुरुवात करण्यात आली असली, तरीही अद्याप शहरातील बहुतांश पोस्ट कार्यालयांत ‘सर्व्हर डाउन’ असल्याची मोठी समस्या उद्भवली आहे. त्याचा फटका राखी पाठविण्याच्या निमित्ताने कधी नव्हे त्या पोस्ट कार्यालयाकडे वळणाऱ्या भगिनी अन् त्यांच्या कुटुंबीयांना बसत आहे. तासन् तास पोस्टाच्या रांगेत उभे राहावे, की कुरिअरच्या सेवेला जवळ करावे, अशा द्विधा मनस्थितीत असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी ‘मटा’शी बोलताना दिली.
