युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले समाविष्ट होण्याच्या प्रक्रीयेमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचा गौरव करण्यात आला आहे. त्यांना पहिला छत्रपती शिवाजी महाराज महावारस पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडू येथील 1 असे एकूण 12 किल्ले समाविष्ट होण्याच्या प्रक्रियेत अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने या सर्व किल्ल्यांचे टू द स्केल मॉडेल (प्रतिकृती) तयार केले. या 12 प्रतिकृतींपैकी 2 प्रतिकृती सांगली येथे तर 10 प्रतिकृती मुंबई येथे अत्यंत विक्रमी वेळेत म्हणजेच अडीच महिन्यात तयार करण्यात आल्या आहेत. याकरिता महासंघाच्या सदस्यांनी प्रत्यक्ष किल्ल्यांवर जाऊन तिथल्या वास्तूंची मोजमापे घेतली व त्यानुसार त्यांचे छोट्या आकारातील प्रमाण ठरवण्यात आले.
या प्रतिकृती मागील वर्षी दिल्ली येथे भारत मंडपम मध्ये पार पडलेल्या सांस्कृतिक प्रदर्शनामध्ये प्रदर्शित केल्या गेल्या. यावेळी वेगवेगळ्या देशांमधील सदस्यांनी या प्रतिकृतींचे कौतुक केले. याचसोबत युनेस्कोचे आलेले शिष्टमंडळही अत्यंत प्रभावित झाले होते. महासंघाने अनेक किल्ल्यांवर स्वच्छता मोहीमही राबविल्या. याबद्दल हा पहिला ‘छत्रपती शिवाजी महाराज महावारस पुरस्कार २०२५’ महासंघाला प्रदान करण्यात आला आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व सन्मानार्थ तीन लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याप्रसंगी मंचावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिषजी शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, अप्पर मुख्य सचिव विकासजी खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव किरण कुलकर्णी, तेजसजी गर्गे (संचालक पुरात्व विभाग) आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींच्या कार्याचा गौरव
महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमी, दुर्गप्रेमी गिर्यारोहक स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव या निमित्ताने झाला व हा पुरस्कार गडकोटांसाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या सर्व संस्था व दुर्गप्रेमींचा आहे अशी भावना महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी व्यक्त केली. याचसोबत या पुरस्कारामुळे या सर्व किल्ल्यांचे भविष्यकाळात आणखी चांगल्या प्रकारे जतन करणे व त्यांचे पावित्र्य राखणे ही जबाबदारी अजून अधिक वाढल्याचे महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष ह्रिषीकेश यादव यांनी सांगितले.

