माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेल्या तीन दिवसांमध्ये दोन वेळा भेट घेतली. त्यामुळे त्यांचं मंत्रिमंडळात कमबॅक होईल, अशी चर्चा होती. पण तसं काहीच घडलं नाही. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे.
मंत्री माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांचा विधीमंडळात रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांचं मंत्रिपद जाईल, अशी चर्चा होती. त्यात धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी घेतल्या. यामुळे धनंजय मुंडे यांना कृषीमंत्रीपद मिळतं की काय? अशी चर्चा सुरु होती. पण तसा निर्णय झाला नाही. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी दोन वेळा नाही तर तीनवेळा आपली भेट घेतली होती, असा खुलासा स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पण त्यांच्या भेटीवेळी मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली नाही तर वेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
दरम्यान, अजित पवार यांच्या एका वक्तव्यामुळे धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात येतील, अशी चर्चा सुरु होती. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. मुडेंनी फक्त एकदाच नव्हे तर दोन वेळा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. धनंजय मुंडे यांना कृषी खात्यातील कथित घोटाळा प्रकरणात कोर्टाकडूनही दिलासा मिळाला होता. त्यामुळे त्याचं मंत्रिमंडळात कमबॅक होईल, अशी चर्चा होती. पण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही चर्चा फेटाळली आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्याची कोणतीही चर्चा नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट म्हटलं आहे. तसेच मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही, असंदेखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
“धनंजय मुंडे यांनी तीनवेळा माझी भेट घेतली आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी भेट घेतली आहे. कुठल्याही भेटीत मंत्रिमंडळाबाबत चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळाची चर्चा ही धनंजय मुंडे यांच्या स्तरावर होत नाही. मंत्रिमंडळाची चर्चा मी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतो”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी त्यानी मंत्र्यांना दिलेल्या इशाऱ्याबाबतही माहिती दिली. “कोणीही अशाप्रकारे बेशिस्त वर्तवणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही तिघांनी सांगितलं आहे की, हे खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई होईल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

