पुण्याची हवेची गुणवत्ता खालावली असून शहराचा प्रवास दिल्लीच्या वाटेवर असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. हवेतील धूलिकणांचं वाढतं प्रमाण धोकादायक ठरत आहे. उपाययोजना करुनही प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यास महापालिकेच्या प्रयत्नांना यश येत नाही.
केंद्र सरकारने ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम’ या योजनेत पुण्याची निवड केली असून, मोठ्या प्रमाणात निधीही देण्यात आला आहे. गेल्या चार वर्षांपासून पुणे महापालिका यावर काम करीत आहे. मात्र, राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना दीर्घकालीन असल्याने हवा प्रदूषणाचे आकडे कमी करण्यास अद्यापही महापालिकेला यश आलेले नाही.
पाच वर्षांपूर्वीपर्यंत पुण्यात वर्षातील सर्वाधिक दिवस समाधानकारक, उत्तम हवेचे नोंदवले होते, अलीकडे मध्यम आणि वाईट दिवसांच्या संख्येत वाढ झाली आहे. हवेची गुणवत्ता ढासळत असल्याने श्वसनाच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. महापालिकेने विविध संशोधन संस्थांच्या सहभागातून संकलित केलेल्या माहितीतून हा निष्कर्ष पुढे आला आहे.
शहरात हिवाळ्यामध्ये हवा स्थिर असते. त्यामुळे हवेत प्रदूषके मिसळून तिची गुणवत्ता ढासळते, हे समीकरण असले, तरी पुण्यामध्ये या काळात हवेतील सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धूलिकणांचे वाढते प्रमाण धोकादायक ठरत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या मानकांपेक्षा जास्त धूलिकणांचे प्रमाण पुण्याच्या हवेत वर्षभर नोंदवले जात आहेत.
शहरात गेल्या वर्षी पावसाळ्याचे दिवस वगळता उर्वरित आठ महिने मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांमध्ये हवेतील सूक्ष्म धूलिकण (पार्टिक्युलेट मॅटर १०) आणि अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम २.५) मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात होते. एप्रिल महिन्यातही लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली. वाहनांमधून होणारे उत्सर्जन, शहराच्या चौफेर सुरू असलेली बांधकामे, सार्वजनिक ठिकाणी जाळला जाणारा कचरा या प्रदूषणास जबाबदार ठरतो आहे.
शिवाजीनगर, लोहगाव, कात्रज, पाषाण या चार प्रमुख भागांतील वर्षभरातील हवेच्या गुणवत्तेचे आकडेवारी प्रसिद्ध केली असून, चारही ठिकाणी हवेतील धूलिकणांचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
