• Sun. Mar 15th, 2026

    तुम्हाला लाज वाटत नाही.. वादग्रस्त मंत्र्यांना अखेरची संधी, अन्यथा कारवाई अटळ; मुख्यमंत्र्यांचा इशारा

    तुम्हाला लाज वाटत नाही.. वादग्रस्त मंत्र्यांना अखेरची संधी, अन्यथा कारवाई अटळ; मुख्यमंत्र्यांचा इशारा

    CM Last Warning to Ministers : वादग्रस्त विधानं आणि त्यांची वादग्रस्त कृती खपवून घेतली जाणार नाही, सरकारची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागावं, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तुम्हाला अखेरची संधी अन्यथा गंभीर कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशाराही फडणवीसांनी दिला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : ‘मंत्र्यांची वादग्रस्त विधाने आणि कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. वादग्रस्त विधानांमुळे सरकारची बदनामी होते. आपले सरकार चांगले काम करत असून विरोधकांच्या हातात आयते कोलित देऊ नका. तुम्हाला ही अखेरची संधी आहे. अन्यथा जी कारवाई करायची ती करूच,’ असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्र्यांना दिला. वादग्रस्त ठरलेल्या मंत्र्यांवर कारवाई टाळताना फडणवीस यांनी मंत्र्यांची लाज काढली. ‘शपथा देऊनही तुम्हाला लाज वाटत नाही,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना फैलावर घेतले.

    राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक मंगळवारी मंत्रालयात झाली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे; तसेच गृह राज्यमंत्री योगेश कदम वादग्रस्त ठरले. चित्रफितींमुळे वादात अडकलेले शिरसाट आणि कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाने लावून धरली होती. त्याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. बैठकीच्या अजेंड्यावरील विषय संपल्यानंतर मुख्य सचिवांसह सर्व अधिकाऱ्यांना बैठकीतून बाहेर काढण्यात आले.

    त्यानंतर थेट विषयाला हात घालण्यात आला. सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मंत्र्यांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांनी सार्वजनिक ठिकाणी बोलताना आपली वर्तणूक चांगली ठेवावी. राज्य सरकार चांगले काम करत असून, मंत्र्यांच्या विधानाने त्यावर पाणी फेरता कामा नये, याची स्पष्ट जाणीव शिंदे आणि पवार यांनी करून दिली.

    त्यानंतर फडणवीस यांनी सरकारला अडचणीत आणणाऱ्या मंत्र्यांना कानपिचक्या दिल्या. ‘मंत्र्यांच्या उलटसुलट विधानांचा थेट परिणाम सरकारच्या प्रतिमेवर होत असल्याने मंत्र्यांनी सांभाळून बोलावे. जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटेल, अशी विधाने कटाक्षाने टाळावीत. येथून पुढे सरकारला अडचण निर्माण करणारी कृती मंत्र्यांकडून झाल्यास मला त्याचा गंभीर विचार करावा लागेल. यापूर्वी आपण सगळ्यांनीच शपथ घेतली आहे. शपथ घेऊनही तुम्हाला लाज कशी वाटत नाही,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.

    माणिकराव कोकाटे यांना समज

    विधिमंडळ अधिवेशनात भर सभागृहात मोबाइलवर रमी खेळतानाची चित्रफीत समाज माध्यमात व्हायरल झाल्याने अडचणीत सापडलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना अजित पवार यांनी कडक शब्दांत समज दिल्याचे समजते. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी कोकाटे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन चूक मान्य केली; तसेच भविष्यात अशी चूक होणार नसल्याची हमी दिली. यापुढे तुमची कुठलीही चूक पाठीशी घातली जाणार नाही, असे पवार यांनी कोकाटे यांना खडसावल्याचे समजते.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा