• Tue. Mar 10th, 2026
    अन्नधान्य उत्पादन महागले; हवामानबदलाचे तीव्र परिणाम उघड, किंमतीत जगभरात मोठी वाढ

    २७ जुलै रोजी संयुक्त राष्ट्रांच्या खाद्यप्रणाली शिखर संमेलनाचे इथियोपिया येथे आयोजन करण्यात आले आहे. यात जगभरातील नेते अन्नउत्पादनाच्या प्रणालीला असलेल्या संभाव्य धोक्यांबद्दल चर्चा करतील.

    food expensiveAI (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    मुंबई : तीव्र वातावरण बदलाचे परिणाम ऊन, पाऊस, थंडी यांवर जाणवत असतानाच, आता अन्नधान्य उत्पादनावरही याचे परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. भारतीय कांदे, ब्रिटिश बटाटे, कॅलिफोर्नियाच्या भाज्या आणि दक्षिण आफ्रिकेतील मका या अन्नधान्यांवर विपरित परिणाम झाल्याचे आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात समोर आले आहे.

    अन्नधान्यावर होणाऱ्या परिणामांसंदर्भात २०२२ ते २०२४ दरम्यान १८ देशांमध्ये अभ्यास करण्यात आला. यासंदर्भातील संशोधन ‘एनव्हायर्नमेंट रिसर्च लेटर्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले. २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये भारतात मेमधील उष्णतेच्या लाटेनंतर कांदे आणि बटाटे यांच्या किमती ८० टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले होते. या कालावधीमध्ये तापमान सर्वसामान्य तापमानापेक्षा १.५ अंशांनी अधिक होते. जगभरातच बटाटा, तांदूळ, भाज्या, ऑलिव्ह ऑइल, कोको आणि कॉफी यांना या तीव्र वातावरण बदलांचा फटका बसत असून यामुळे महागाई वाढत आहे. याच कारणामुळे आरोग्यासाठी हितकारक अन्नधान्य हे तुलनेने कमी पौष्टिक आहारापेक्षा दुप्पट महाग असते. अन्न महागले की कमी उत्पन्न असलेल्या घरांमध्ये भाज्या, फळे विकत घेण्याचे प्रमाणही कमी होते आणि याचा थेट संबंध कुपोषण, आजार आणि मानसिक आरोग्यावरही होतात, असे या संशोधनात अधोरेखित करण्यात आले आहे.
    खंडाळा घाटातील विचित्र अपघाताचं कारण काय? तब्बल 24 वाहनांना धडक, एक महिला जागेवरच ठार, २१ जखमी
    जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत यूकेमध्ये बटाट्यांच्या किमती २२ टक्क्यांनी वाढल्या होत्या. या कालावधीत हिवाळी पावसाचे प्रमाण तीव्र होते. अमेरिकेत नोव्हेंबर २०२२ मध्ये कॅलिफोर्निया आणि ॲरिझोना येथे भाज्यांच्या किमती ८० टक्क्यांनी वाढल्या होत्या. या कालावधीत दुष्काळ निर्माण झाला होता. त्यामुळे पाण्याची कमतरता, तीव्र उष्णता आणि जमिनीत आर्द्रता नसल्याने स्थानिक उन्हाळ्यामध्ये भाज्यांचे उत्पादन बाधित झाले.

    एप्रिल २०२४ मध्ये कोकोच्या किमती जगभरात २८० ते ३०० टक्के वाढल्या होत्या. घाना, आयव्हरी कोस्ट येथे उष्णतेच्या लाटेमुळे जागतिक कॉफी मार्केटवर हा परिणाम झाला आहे. जपानमध्ये ऑगस्टमध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटांनंतर सप्टेंबर २०२४ मध्ये तांदळाच्या किमती ४८ टक्के वाढल्या होत्या.
    Chandrashekhar Bawankule: हिंमत असेल तर मंत्र्यांची नावे घेऊन आरोप करा; संजय राऊतांना बावनकुळेंचे आव्हान
    गरिबांना फटका
    जगभरातील सर्व देश शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय गाठत नाहीत, तोपर्यंत अशा वातावरणीय घटनांची तीव्रता अधिकाधिक वाढत जाणार आहे, याकडे शोधनिबंधाचे लेखक कोट्झ यांनी लक्ष वेधले आहे. यामुळे शेती उत्पादनाचे नुकसान होत आहे आणि याचा परिणाम जगभरातील अन्नधान्याच्या किमतीवर होत आहे. याचा सर्वाधिक फटका गरीबांना बसत आहे. दरवर्षी उन्हाळ्याची व पावसाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे पिकांवरील दुष्परिणामांचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा