NCP Latur Rada: लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी छावा पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याने अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना लोकशाही मार्गाने वागण्याचा सल्ला देत, हिंसेचा मार्ग टाळण्यास सांगितले आहे. सूरज चव्हाण यांनी या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
लातूरमधील घटनेवर अजित पवारांनी नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे की, “लातूरमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता व बंधुत्वाच्या विचारांवरच उभी आहे,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
Pune News : स्विफ्टची मागून धडक, पुण्यात मर्सिडीजची तोडफोड, 10 वर्षांच्या चिमुरड्याला गाडीत कोंडलं
अजित पवार यांनी यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना समज दिली आहे. “माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही, शांतता आणि अहिंसा या मुल्यांना प्राधान्य द्या,” अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
सूरज चव्हाणांनी काय खुलासा केला?
लातूरधील राड्यानंतर सूरज चव्हाण म्हणाले, “काल राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. काही कार्यकर्त्यांनी असंवैधानिक शब्द वापरले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना राग आला. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मारहाण झाली, हे चुकीचे आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणाऱ्यांच्या पाठीशी मी उभा आहे.”
“आमच्या नेत्यांबद्दल वाईट बोलल्यामुळे कार्यकर्त्यांनी मारहाण केली. हे चुकीचे झाले. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. लवकरच विजय घाटगे पाटील यांची भेट घेऊन गैरसमज दूर करेन,” असेही चव्हाण म्हणाले.

