• Sun. Mar 8th, 2026
    ‘…तर दुकानं नाही, शाळाही बंद करेन’, राज ठाकरे यांचा फडणवीसांना इशारा

    Raj Thackeray Speech : मीरा रोडमध्ये मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन मनसे कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केली होती. यानंतर अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्या मोर्चाला उत्तर म्हणून मनसे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीकडून 8 जुलैला मीरा रोडमध्यो मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: मीरा रोडच्या दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा इशारा दिला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मीरा रोड येथील सभेत मोठा इशारा दिला आहे. राज ठाकरे आज मीरा रोड शहराच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्या हस्ते मीरा रोडमध्ये नित्यानंद नगर येथे मनसेच्या शाखेचं उद्घाटन झालं. त्यानंतर राज ठाकरे यांची भव्य सभा पार पडली. या सभेत हजारो मीरा भाईंदरचे नागरीक, कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. या सभेत राज ठाकरे काय भूमिका मांडणार? याबाबत उत्सुकता होती. अखेर राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात इयत्ता पहिली ते पाचवी हिंदी सक्ती करुन दाखवा. फक्त दुकानं नाही तर शाळा सुद्धा बंद पाडणार, असा मोठा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

    राज ठाकरे काय म्हणाले?

    “मुंबईतून घरातून निघालो आणि इथे पोहोचायला जवळपास 2 तास लागले. मी दरवेळेला आपल्या लोकांना सांगतो की, स्वागतामुळे वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे इथे यायला वेळ होतो. आज इकडे मीरा भाईंदरला मी मुद्दामून आलो. त्यादिवशी तो घडलेला जो प्रसंग होता इथला, मीठावाल्याचा काहीतरी झाला तो भाग. कानावरती मराठी भाषा समजणार नाही तर कानाखाली बसणारच मराठी. विनाकारण काहीतरी काढत असतात”, असं राज ठाकरे म्हणाले.

    ‘तुमच्या कानफटात मारली होती का?’

    “छोटा प्रसंग होता तो. मोर्चासाठी म्हणून माझे महाराष्ट्र सैनिक तिथे पाणी प्यायला गेले. तेव्हा माणसाने विचारलं की, कशासाठी मोर्चा काढताय, त्यांनी सांगितलं हिंदी सक्तीचं केलंय म्हणून. म्हणे, इथे तर हिंदीतच बोलतात म्हणे. सगळं हिंदत संभाषण सुरु होतं. त्या माणसाच्या अरेरावीमध्ये त्याच्या जी काही कानफटीत बसायचं ती बसली. लगेच इकडच्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. तुमच्या कानफटात मारली होती का? अजून नाही मारली”, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं.

    ‘मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार’

    “विषय समजून न घेता, काय झालंय ते माहिती नसताना कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन तुम्ही बंद करणार असाल, तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीयत? दुकानं बंद करुन किती काळ राहणार आहात? शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरंच दुकान चालणार ना? महाराष्ट्रात राहताय तर शांतपणे राहा, मराठी शिका. आमचं तुमच्याशी काही वावडं नाहीय. पण मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा”, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

    ‘दुकानं नाही शाळाही बंद करेन’

    “काय विषय होता? पहिलीपासून हिंदी भाषा शिकली पाहिजे. त्यापासून हे सगळं सुरु झालं. आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल सांगितलं म्हणे, तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार. आता राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी बेशक करावी. त्यासाठी नुसत्या मोर्चाच्या धसक्याने निर्णय मागे घ्यावा लागला होता. फडणवीसजी तुम्ही सांगताय ना, तिसरी भाषा सक्तीची आणणार म्हणजे आणणार. मी आता इथे सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी भाषा सक्तीची आणण्याचा केवळ प्रयत्न करुन बघा. दुकानं नाही शाळाही बंद करेन”, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

    “महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय? मराठी सक्तीची केली पाहिजे. ते सोडून तुम्ही हिंदी सक्तीची करण्यामागे लागले आहात. कोणाच्या दबावाखाली? तुमच्यावर कोण दबाव टाकतंय? हे केंद्राचं पूर्वीपासूनचं आहे. काँग्रेस असल्यापासूनचं हे सगळं आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, त्याचा प्रचंड मोठा लढा होता, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा प्लॅन होता. तो प्लॅन गुजराती व्यापारी आणि नेत्यांचा होता”, असा दावा राज ठाकरे यांनी केला.

    “मुंबई महाराष्ट्राला मिळू नये यासाठी जे पहिलं बोललं गेलं ते वल्लभाई पटेल यांनी सांगितलं की, मुंबई महाराष्ट्राला देऊ नका. आचार्य अत्रे यांच्या पुस्तकात मी वाचलं. ज्यांना आम्ही लोहपुरुष म्हणतो त्यांनी महाराष्ट्राला विरोध केला? मोरारजी देसाई यांनी गोळीबार करुन मराठी माणासाला ठार मारलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून ह्यांचा मुंबईवर डोळा आहे. हे सहज होत नाहीय. हे तुम्हाला तपासून बघत आहेत की, हिंदी भाषा आली बघू मराठी माणूस पेटतोय का? तो जर शांत बसला तर हिंदी भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेन. हळूहळू करुन मुंबई ताब्यात घ्यायची आणि ते गुजरातला मिळवायची हे स्वप्न आहे”, असादेखील दावा राज ठाकरे यांनी केला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा