Nagpur’s Cotton Market: नागपूर शहरातील कॉटन मार्केटच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) सुमारे २३५ कोटी रुपये खर्चून हे काम करणार आहे. या अंतर्गत शहरातील सर्वात उंच व्यावसायिक संकुल उभारले जाणार असून, त्यात आधुनिक सुविधा, व्यापारी गाळे, हॉटेल आणि पार्किंगची सोय असणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली. हा प्रकल्प बांधा, वापरा, हस्तांतरित करा या आर्थिक तत्त्वावर उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पाअंतर्गत सुमारे ८ हजार ७० चौरस मीटरच्या जागेवर एकीकृत व्यावसायिक संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे ६० हजार ९४७ चौरस मीटर जागेवर बांधकाम करण्यात येणार आहे. यामुळे अनेक दशके जुन्या कॉटन मार्केटमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा बहुमजली संकुलाची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पाला नियोजन व सरेखन मंजुरी ६ जूनलाच देण्यात आली आहे.
दोनशे कोटींचे हरित कर्जरोखे; सिंहस्थ विकासकामांसाठी महापालिकेचे नियोजन, सल्लागार नियुक्त
या उंच व्यावसायिक संकुलात दोन टॉवर्स उभारण्यात येणार आहेत. यात एका टॉवरमध्ये विविध ऑफिसेस, तर दुसऱ्या टॉवरमध्ये हॉटेल असेल. त्याचबरोबर पाचव्या आणि २४व्या मजल्यावर सर्व्हिस अपार्टमेंटची निर्मिती करण्यात येईल. या संकुलाच्या खालच्या मजल्यावर लहान विक्रेत्यांसाठी दुकाने, रेस्टॉरंट, कॅफे, सिनेमा हॉल्स, हेल्थ क्लब, ग्रंथालय, लहान मुलांसाठी खेळाचा भाग आणि सभागृह बांधण्यात येणार आहे. यात तळमजल्यावर २८ दुकानदारांचे पुनर्वसन आणि गणेशमंडळाच्या देखाव्यांसाठी जागा ठेवण्यात आली आहे.
दुकानांचे पुनर्वसन
बाजारपेठेच्या पुनर्विकास आराखड्यात याठिकाणी सध्या असलेल्या २८ दुकानदारांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. यामध्ये अधिकृत व अनाधिकृत अशा दुकानदारांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी तळमजल्यावर एक हजार ५२० चौरस मीटरची जागा ठेवण्यात आली आहे. या पुनर्वसनासाठी जवळपास ६.५७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
Chhagan Bhujbal यांचं खासदारकीच्या प्रश्नावर मिश्किल उत्तर, काय म्हणाले पाहा?
दुचाकी, चारचाकींचे पार्किंग
शहरातील सर्वात उंच असणाऱ्या या व्यावसायिक संकुलात नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होणार असल्याने याठिकाणी ३१९ कार आणि ६५८ दुचाकींच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनांची संख्या लक्षात घेता रस्त्याची रुंदी २४ मीटर इतकी ठेवण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या आराखड्याअंतर्गत मोकळी जागा ठेवण्यात आली असली तरी पहिल्या टप्प्यात ती न सोडण्याचे प्रस्तावित आहे.
