• Thu. Jun 18th, 2026

    ड्रग्जसाठी ओखळले जाणारे राज्य शिक्षणात अव्वल, महाराष्ट्र कितव्या स्थानी?

    ड्रग्जसाठी ओखळले जाणारे राज्य शिक्षणात अव्वल, महाराष्ट्र कितव्या स्थानी?

    Maharashtra Rank In Education: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार झालेल्या सर्वेक्षणात पंजाबने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर महाराष्ट्र या यादीत आठव्या क्रमांवर आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) ‘परख’ संस्थेकडून घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणात महाराष्ट्र आठव्या स्थानी आला आहे, तर पंजाबने पहिला क्रमांक पटकावला आहे. या सर्वेक्षणात कोल्हापूर जिल्ह्याने सर्व इयत्तांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ची तुलना करता इयत्ता नववीचा गणित विषय वगळता महाराष्ट्राच्या सरासरी संपादणुकीमध्ये तीन टक्के वाढ झाली आहे.

    सर्वेक्षणात देशातील ८७ हजार शाळांमधील सुमारे २३ लाख विद्यार्थी सहभागी

    गेल्या वर्षी चार डिसेंबरला झालेल्या या सर्वेक्षणात देशातील ८७ हजार शाळांमधील सुमारे २३ लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्वेक्षणातून इयत्ता तिसरी, सहावी आणि नववीतील विद्यार्थ्यांचे भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यास या विषयांमधील विद्यार्थ्यांची संपादणूक तपासण्यात आली आहे. या सर्वेक्षणात राज्यातील चार हजार ३१४ शाळा, १३ हजार ९३० शिक्षक आणि एक लाख २३ लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. मुलांची संख्या ५१ टक्के असून, मुलींचा सहभाग ४९ टक्के इतका होता. सरकारी शाळांचे प्रमाण २९ टक्के, अनुदानित शाळंचे प्रमाण ३२ टक्के, तर खासगी शाळांचे ३३ टक्के आणि केंद्रीय शाळांचे सात टक्के होते.

    पंजाबने अव्वल क्रमांक पटकाविला

    इयत्ता तिसरीच्या संपादणुकीमध्ये पंजाबने अव्वल क्रमांक पटकाविला, तर महाराष्ट्राने सहावा क्रमांक पटकावला. इयत्ता सहावीमध्ये संपादणुकीमध्ये केरळने अव्वल स्थान पटकावले असून, महाराष्ट्र सातव्या स्थानी आहे. इयत्ता नववीमध्ये पंजाब अव्वल ठरले असून, महाराष्ट्राने दहावा क्रमांक पटकावला. इयत्ता सहावीच्या निष्कर्षांनुसार, भाषा विषयात महाराष्ट्राची सरासरी ६२ टक्के असून, ती राष्ट्रीय सरासरीपेक्षा पाच टक्क्यांनी जास्त आहे.

    भाषा व सामाजिक शास्त्र विषयात मुलींची चांगली कामगिरी

    भाषा व सामाजिक शास्त्र विषयात मुली सरासरीपेक्षा चांगली कामगिरी करीत असल्याचे इयत्ता नववीच्या निष्कर्षांमध्ये दिसून आले आहे. ग्रामीण विद्यार्थी काही जिल्ह्यांमध्ये (उदा. कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी) राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगले काम करीत असल्याचेही दिसून आले आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा