Pratap Sarnaik News: मिरा भाईंदरमध्ये मराठी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी नाकारल्याने तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे समर्थन केले असले, तरी मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सरनाईक यांनी मोर्चेकऱ्यांच्या अटकेचा निषेध करत मोर्चात सहभागी होण्याची घोषणा केली, ज्यामुळे सरकारमधील मतभेद उघड झाले आहेत.
“आज सकाळपासून पोलिसांनी मराठी कार्यकर्त्यांची आणि मराठी माणसाची गुंडगिरीच्या मार्गाने जी धरपकड सुरू केली आहे त्याचा मी निषेध करतो. मुख्यमंत्र्यांकडे मी हा निषेध व्यक्त केला आहे. आता मी स्वत: या मोर्चात सहभागी होण्यासाठी मिरा भाईंदरकडे निघालो आहे. पोलिसांची हिंमत असेल तर मला अटक करून दाखवावी,” असं खुलं आव्हान प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना दिलं आहे. एकीकडे मोर्चावरून मुख्यमंत्री पोलिसांची पाठराखण करत असतानाच त्यांच्याच मंत्रिमंडळातील सरनाईक मात्र पोलिसांवर आगपाखड करत असल्याने सरकारमध्ये या मुद्द्यावरून मतभेद असल्याचं उघड झालं आहे.
Narendra Mehta : परप्रांतीय मोर्चाचा हेतू स्पष्ट; मराठी भाषिकांना मात्र दाखवायचं एक करायचं भलतं; भाजप आमदार नरेंद्र मेहतांचं वक्तव्य
सरनाईकांचा संताप, पोलिसांबद्दल काय म्हणाले?
पोलीस कारवाईबद्दल संताप व्यक्त करताना प्रताप सरनाईक म्हणाले की, “मिरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांची मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. कारण ज्या पद्धतीने कालपासून पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे ती योग्य नाही. मराठी भाषिकांनी शांतताप्रिय मार्गाने मोर्चासाठी परवानगी मागितल्यानंतर ती परवानगी द्यायला हवी होती. पण पोलिसांनी कालपासून दादागिरी आणि गुंडगिरी सुरू केली आहे. ही दादागिरी त्या परिसराचा आमदार म्हणून प्रताप सरनाईक कधीही सहन करणार नाही,” अशी भूमिका सरनाईक यांनी मांडली आहे.
दरम्यान, “मराठीच्या मोर्चात मराठी एकीकरण समितीसह विविध राजकीय पक्षांचे लोक सहभागी होणार होते. परंतु पोलिसांकडून जी दादागिरी सुरू आहे ती दादागिरी मी सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांकडे पोलिसांची तक्रार केली असून तेदेखील पोलिसांवर प्रचंड नाराज आहेत,” असंही सरनाईक म्हणाले.
मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या भूमिकेबद्दल माहिती दिली. मोर्चाच्या मार्गावरून परवानगी नाकारल्याचं त्यांनी सांगितलं. काही लोकं वेगळ्या मार्गाने जाऊन संघर्ष निर्माण करण्याच्या तयारीत होते, असं पोलिसांना इनपुट मिळालं होतं. त्यामुळे पोलिसांनी नेहमीचा मार्ग घेण्यास सांगितलं. पण, मोर्चा काढणाऱ्यांनी नकार दिल्याने परवानगी नाकारली, असं फडणवीस म्हणाले.

