• Tue. Mar 10th, 2026

    पोलिसांची गुंडगिरी, हिंमत असेल तर मला अटक करा; मंत्री सरनाईकांचं चॅलेंज, थेट CM विरोधी भूमिका

    पोलिसांची गुंडगिरी, हिंमत असेल तर मला अटक करा; मंत्री सरनाईकांचं चॅलेंज, थेट CM विरोधी भूमिका

    Pratap Sarnaik News: मिरा भाईंदरमध्ये मराठी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी नाकारल्याने तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे समर्थन केले असले, तरी मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सरनाईक यांनी मोर्चेकऱ्यांच्या अटकेचा निषेध करत मोर्चात सहभागी होण्याची घोषणा केली, ज्यामुळे सरकारमधील मतभेद उघड झाले आहेत.

    पोलिसांची गुंडगिरी सुरूय, मी मोर्चात निघालोय, हिंमत असेल तर मला आडवा; मंत्री सरनाईकांचं थेट CMना आव्हान (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई: मिरा भाईंदरमध्ये मराठी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी नाकारत पोलिसांनी मोर्चेकऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याने आज मध्यरात्रीपासून शहरात प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांच्या या कारवाईवर मराठी भाषिक संताप व्यक्त करत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पोलिसांची ठामपणे पाठराखण केली. आम्हाला अमूक एका मार्गावरून मोर्चा काढायचा आहे, अशी भूमिका घेऊन कायदा-सुव्यवस्था बिघडवणं योग्य नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मोर्चाच्या आयोजकांना फटकारलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशी भूमिका घेतली असतानाच सरकारमधीलच एक मंत्री असलेल्या प्रताप सरनाईक यांनी मोर्चेकरांची बाजू घेत पोलिसांवर गंभीर आरोप केले असून मी या मोर्चात सहभागी होण्यासाठी जात असल्याचं जाहीर केलं आहे.

    “आज सकाळपासून पोलिसांनी मराठी कार्यकर्त्यांची आणि मराठी माणसाची गुंडगिरीच्या मार्गाने जी धरपकड सुरू केली आहे त्याचा मी निषेध करतो. मुख्यमंत्र्यांकडे मी हा निषेध व्यक्त केला आहे. आता मी स्वत: या मोर्चात सहभागी होण्यासाठी मिरा भाईंदरकडे निघालो आहे. पोलिसांची हिंमत असेल तर मला अटक करून दाखवावी,” असं खुलं आव्हान प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना दिलं आहे. एकीकडे मोर्चावरून मुख्यमंत्री पोलिसांची पाठराखण करत असतानाच त्यांच्याच मंत्रिमंडळातील सरनाईक मात्र पोलिसांवर आगपाखड करत असल्याने सरकारमध्ये या मुद्द्यावरून मतभेद असल्याचं उघड झालं आहे.

    Narendra Mehta : परप्रांतीय मोर्चाचा हेतू स्पष्ट; मराठी भाषिकांना मात्र दाखवायचं एक करायचं भलतं; भाजप आमदार नरेंद्र मेहतांचं वक्तव्य

    सरनाईकांचा संताप, पोलिसांबद्दल काय म्हणाले?

    पोलीस कारवाईबद्दल संताप व्यक्त करताना प्रताप सरनाईक म्हणाले की, “मिरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांची मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. कारण ज्या पद्धतीने कालपासून पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे ती योग्य नाही. मराठी भाषिकांनी शांतताप्रिय मार्गाने मोर्चासाठी परवानगी मागितल्यानंतर ती परवानगी द्यायला हवी होती. पण पोलिसांनी कालपासून दादागिरी आणि गुंडगिरी सुरू केली आहे. ही दादागिरी त्या परिसराचा आमदार म्हणून प्रताप सरनाईक कधीही सहन करणार नाही,” अशी भूमिका सरनाईक यांनी मांडली आहे.

    दरम्यान, “मराठीच्या मोर्चात मराठी एकीकरण समितीसह विविध राजकीय पक्षांचे लोक सहभागी होणार होते. परंतु पोलिसांकडून जी दादागिरी सुरू आहे ती दादागिरी मी सहन करणार नाही. मुख्यमंत्र्‍यांकडे पोलिसांची तक्रार केली असून तेदेखील पोलिसांवर प्रचंड नाराज आहेत,” असंही सरनाईक म्हणाले.

    मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या भूमिकेबद्दल माहिती दिली. मोर्चाच्या मार्गावरून परवानगी नाकारल्याचं त्यांनी सांगितलं. काही लोकं वेगळ्या मार्गाने जाऊन संघर्ष निर्माण करण्याच्या तयारीत होते, असं पोलिसांना इनपुट मिळालं होतं. त्यामुळे पोलिसांनी नेहमीचा मार्ग घेण्यास सांगितलं. पण, मोर्चा काढणाऱ्यांनी नकार दिल्याने परवानगी नाकारली, असं फडणवीस म्हणाले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय. यापूर्वी लोकमत आणि न्यूज १८ लोकमत या संस्थांमध्येही कामाचा अनुभव.… आणखी वाचा