Ashish Shelar Statement on MNS : मुंबईतील मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषेवरून एका व्यापाऱ्याला मारहाण झाली. या घटनेची तुलना भाजप नेते आशिष शेलार यांनी पहलगाम हल्ल्याशी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेसने टीका केली आहे. अमराठी नागरिकांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही आशिष शेलार यांनी दिला. यावर किशोरी पेडणेकर, बाळा नांदगावकर आणि विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?
“मला तर या सगळ्या गोष्टींची उद्विग्नता येते. पहलगाममध्ये त्या लोकांनी धर्म विचारुन हिंदूंना गोळ्या घातल्या. इथे ही सर्व मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारुन चोपत आहेत. सरकारने कडक पावलं उचलावेत. आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत. मोठा पक्ष आहोत, मोठा भाऊ आहोत. मोठी जबाबदारी आहे. हे प्रकार वाढता कामा नयेत. मराठी माणसाच्या अस्मितेची चर्चा भाजपच करेल. आणि अमराठी माणसांवरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही”, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं.
किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया
आशिष शेलार यांच्या टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं. “आशिष शेलार हे आमदार आहेत. त्यांचं पक्षात मोठं स्थान आहे. पहलगाममध्ये ज्यांनी मारलं ते मारले की गाडले गेले, याचं तर आधी उत्तर द्या. लोकं त्याची अपेक्षा करत आहेत. ती घटना झाल्यानंतर दहशतवादी पळून कसे पळून गेले?”, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला.
बाळा नांदगावकर काय म्हणाले?
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीदेखील आशिष शेलारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. “तुमचा पक्ष काय सामाजिक संस्था आहे? तुमचा पक्ष काय करतोय आख्खा देशात, तेच करतोय ना. बरं आता कोणत्या निवडणुका नाहीत. तुम्हीच दिलं ना कोलित आमच्या हातात? आम्ही हिंदी भाषेच्या विरोधात थोडी आहोत. हिंदी भाषा पाहिजेच. पण पहिले ते पाचवी पर्यंत नसावी. एवढंच आमचं म्हणणं होतं”, असं बाळा नांदगावकर म्हणाले.
… तर कानाखाली आवाज काढा, पण कसा? राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला मंत्र
विजय वडेट्टीवार यांची टीका
आशिष शेलारांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. “दोन भाऊ एकत्र आल्यामुळे आता त्यांना पहलगाम आठवायला लागला. तुम्ही पाकिस्तानात जावून 100 मारल्याचं छाती ठोकून सांगतोय. पण ज्यांनी गोळ्या झाडल्या ते 4 लोकं सापडले नाहीत. अडीचशे किलो आरडीएक्स आला, आमचे 49 जवान शहीद झाले. ह्यांची भीती स्वभाविक आहे. दोन भाऊ एकत्र आल्याने शेलारांची पंचायत झाली आहे”, असा खोचक टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

