गुंतवणूकदार सुशील केडिया सध्या चर्चेत आहेत. त्यांनी मराठी भाषा न शिकण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. राज ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे. मनसेने त्यांना इशारा दिला आहे.
शेअर बाजार आणि गुंतवणूक तज्ज्ञ अशी सुशील केडियांची ओळख आहे. मराठी बोलणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या एका अमराठी दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिरारोडमध्ये मारहाण केली. यानंतर केडिया यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन काल एक पोस्ट केली. ‘मुंबईत ३० वर्षे राहूनही मला मराठी नीट समजत नाही. जोपर्यंत तुमच्यासारख्यांना मराठी माणसांची देखभाल करण्याचा दिखावा करण्याची परवानगी दिली जात नाही, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. तशी प्रतिज्ञा मी घेतोय. काय करायचंय ते बोल?’, अशा शब्दांत केडिया यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिलं.
Do note @RajThackeray I dont know Marathi properly even after living for 30 years in Mumbai & with your gross misconduct I ahve made it a resolve that until such people as you are allowed to pretend to be taking care of Marathi Manus I take pratigya I wont learn Marathi. Kya…
— Sushil Kedia (@sushilkedia) July 3, 2025
कोण आहेत सुशील केडिया?
सुशील केडिया शेअर बाजार आणि गुंतवणूक तज्ज्ञ आहेत. २५ वर्षांपासून ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बँकांसोबत काम करत आहेत. मार्केट टेक्निशियन्स असोसिएशनाच्या संचालक मंडळावर वर्णी लागलेले ते आशियातील पहिले व्यक्ती आहेत. त्यांनी केडियानॉमिक्स नावाच्या रिसर्च फर्मची स्थापना केलेली आहे. शेअर बाजाराशी संबंधित सेवा देण्याचं काम ही कंपनी करते. सुशील केडिया अनेक बिझनेस चॅनेलवर पाहुणे म्हणून जातात. तिथे ते शेअर बाजार आणि गुंतवणूक विषयावर अधिकारवाणीनं बोलतात. मुंबईत राहणाऱ्या केडियांना हिंदी, इंग्रजीशिवाय बंगाली, गुजराती, मराठी भाषा अवगत आहे.
मनसेकडून धमक्या, केडियांना हवी सुरक्षा
मराठी भाषा बोलणार नाही, अशी प्रतिज्ञा करणाऱ्या सुशील केडियांनी कालपासून अनेक पोस्ट केल्या आहेत. ड्रामा बंद कर राज ठाकरे , असं म्हणत त्यांनी मनसे प्रमुखांना डिवचलं आहे. ‘तुझ्या २-४ गुंडांनी १०-२० थोपाडीत मारल्या तर मारु देत. आमच्यासारखे आमल्या पद्धतीनं आमरण उपोषणाला बसले आणि तू हात जोडून माफी मागत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी घोषणा केली तर तुझं काय होईल,’ असा सवाल केडियांनी पोस्टमधून विचारला आहे. राज ठाकरे अमराठी व्यक्तीला धमक्या देत असताना देवेंद्र फडणवीस शांत राहणार का, असा प्रश्न केडिया यांनी मुख्यमंत्र्यांना पोस्टमधून टॅग करुन उपस्थित केला आहे.
राज ठाकरे तुमचे शेकडो कार्यकर्ते मला अस्खलित मराठी भाषा बोलायला लावू शकत नाहीत, असंही केडिया यांनी अन्य एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. मनसैनिकांकडून मला धमक्या मिळत असून पोलिसांनी मला संरक्षण द्यावं, अशी मागणी केडिया यांनी केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या गृह मंत्रालयाला टॅग केलेलं आहे.

