कोकणात पर्यटनासाठी आलेल्या एका पुण्यातील मित्रांसोबत दुर्घटना घडली. समुद्रकिनाऱ्यावर गेल्यानंतर त्यांना पोहण्याचा मोह झाला आणि आक्रित घडले पावसामुळे किनारा बंद असतानाही पर्यटक समुद्रात उतरले.
तनिष्क मल्होत्रा आणि त्याचे मित्र मार्क मिल्टन, वरुण तिवारी, पुण्य पाटील हे चौघेजण काशीद समुद्रात पोहण्यासाठी गेले. तनिष्कला पाण्याची खोली जास्त असल्या कारणाने बाहेर येता आले नाही. तो लाटाच्या सहाय्याने वाहत जाऊन तो पाण्यात दिसेनासा झाला असे मित्रांनी सांगितले. त्याला शोधण्याचा प्रयत्न पोलीस व लाईफ गार्ड यांच्याकडून सुरू आहे. त्याच्या सोबत असलेले त्याचे तीन मित्र मार्क मिल्टन, वरुण तिवारी, पुण्य पाटील यांना वाचवण्यात यश आले आहे.
तनिष्क मल्होत्रा याच्या शोध कार्यासाठी काशीद येथील लाईफ गार्ड तसेच स्थानिक नागरिक यांच्या मदतीने त्याचे शोधकार्य सुरू आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्र येथील सागर पाठक यांच्याशी संपर्क करून त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे रोहा येथील रेस्क्यू टीमचे सागर दहिमकर यांना कळविण्यात आले असून त्यांची टीम आल्यानंतर पुढील शोधकार्य करत आहे.
सध्या पावसाळी हंगाम असल्याने हा किनारा बंद ठेवण्यात आला आहे. परंतु, काही उत्साही पर्यटक कोणालाही न जुमानता थेट समुद्रात उतरत आहेत. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. पावसाळी हंगाम असल्याने समुद्रात पोहण्यास जाऊ नये असे आवहन मुरुड पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कुमार देशमुख यांनी केले आहे.काशीद येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्याने जीवितहानी टाळण्यासाठी निदान एक स्पीड बोट तैनात करावी, अशी मागणी पर्यटकांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडे केली आहे.

