• Sun. Mar 8th, 2026

    Bachchu Kadu : ‘एकनाथ शिंदे गट संकटात’, बच्चू कडू यांचा दावा, शरद पवार यांच्याबद्दलही मोठं भाष्य

    Bachchu Kadu : ‘एकनाथ शिंदे गट संकटात’, बच्चू कडू यांचा दावा, शरद पवार यांच्याबद्दलही मोठं भाष्य

    Bachchu Kadu News : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना राजकीय संकटात असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्यावर त्यांनी ‘ही पवार नीती’ असल्याची टिप्पणी केली. भाजप देशातील प्रत्येक मोठ्या राज्यात ताकद वाढवत आहे, महाराष्ट्रातही लवकरच राजकीय पुनर्रचना पाहायला मिळेल, असा दावा बच्चू कडू यांनी केला.

    (फोटो– Lipi)

    नागपूर : महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत माजी आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना ही राजकीय संकटात असल्याचादेखील दावा बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर भाष्य करताना त्यांनी “ही पवार नीती आहे” अशी खोचक टिप्पणी केली. “राष्ट्रवादी काँग्रेस आधीपासूनच एकत्र आहे. मी कितीही पुरावे दिले, तरीही काही लोक वेगळेपण दर्शवत आहेत. ही चाणक्य नीतीप्रमाणेच पवार नीती आहे”, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.

    बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं. “शिंदे गटाची स्थिती संकटात आहे. अजित पवार आधी यांच्या सरकारमध्ये होते म्हणून त्यांचं नाव घेत हे सगळे फुटले. पण आता अजित पवार येऊन बसले. आता त्यांची पंचायत झाली आहे”, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

    ‘भाजप आपली ताकद वाढवत आहे’

    राज्यातील आगामी राजकीय पुनर्रचनेबाबत बच्चू कडू यांनी दावा केला. “भाजप सध्या देशातील प्रत्येक मोठ्या राज्यात आपली ताकद वाढवत आहे. महाराष्ट्रातही हीच पुनर्रचना लवकरच पाहायला मिळेल. ही एक आखलेली रणनीती आहे. राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील सुसंवाद आणि समन्वय हीच या योजनेच्या यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे”, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं.

    Bachchu Kadu : ‘एकनाथ शिंदे गट संकटात’, बच्चू कडू यांचा दावा, शरद पवार यांच्याबद्दलही मोठं भाष्य

    बच्चू कडू यांनी मुंबई आणि कोकणातील मराठी मतदारांबाबत एक गंभीर मुद्दा उपस्थित केला. “मुंबईतल्या मराठी माणसाची एकंदरीत मतदानाची संख्या घटणारी आहे. कारण दोन ठिकाणी मराठी माणसाचं मतदान आहे. एक कोकणात आणि एक मुंबईत आहे. ते लगेच एक पत्र काढणार आणि जो दोन्ही ठिकाणी मतदान ठेवेल त्याला 15000 रुपये दंड करतील, अशा पद्धतीचे संकेत आम्हाला भेटले आहे. म्हणजे सत्तेसाठी सगळे नियम बाजूला ठेवून बीजेपी राजकारणातला सगळ्यात बेकार राजकारण म्हणजे औरंगजेब ज्या विचित्र पद्धतीने चाली करून यायच्या तेवढे जरी नसलं तरी राजकारणात काहीही करावं पण सत्ता हाती घ्यावी, अशा मानसिकतेत सध्या भाजप आहे”, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed