Kajwa Festival 2025: राज्यात कळसूबाई, हरिश्चंद्र अभयारण्य, भंडारदरा, राजमाची, माळशेज घाट, भीमाशंकरसह विविध भागांत मोठ्या प्रमाणात काजवा महोत्सवांचे आयोजन करण्यात येते आहे.
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर वळवाचा पाऊस सुरू झाला, की सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये काजव्यांचा मिलनकाळ सुरू होतो. या काळात मोठ्या वृक्षांवर दिव्यांच्या माळांप्रमाणे लुकलुकणारे काजवे पाहणे हा नेत्रदीपक सोहळा असतो. गेल्या काही वर्षांत हा सोहळा बघण्यासाठी हजारो पर्यटक सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हजेरी लावत आहेत. परिणामी, या उपक्रमाला महोत्सवाचे स्वरूप आले असून, राज्यात कळसूबाई, हरिश्चंद्र अभयारण्य, भंडारदरा, राजमाची, माळशेज घाट, भीमाशंकरसह विविध भागांत मोठ्या प्रमाणात काजवा महोत्सवांचे आयोजन करण्यात येते आहे. यातून स्थानिकांना रोजगारही मिळाला आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून महोत्सवातील पर्यटकांची गर्दी अनियंत्रित झाली असून, त्यात बेशिस्तपणा वाढला आहे.
लाल इश्क! ज्याच्यासाठी घरदार सोडलं, त्यानेच केला घात; प्रियकराने प्रेयसीला निर्घृणपणे संपवलं
बेजबाबदार पर्यटकांमुळे काजव्यांचा अधिवास धोक्यात आल्याने महोत्सवाला तातडीने शिस्त लावण्याच्या मागणीसाठी पर्यावरणप्रेमी गणेश बोऱ्हाडे यांनी ‘एनजीटी’कडे याचिक दाखल केली होती. या प्रकरणी गेल्याच आठवड्यात ‘एनजीटी’ने काजवा महोत्सवाच्या आयोजनाबाबतची नियमावली, निर्बंधांची सद्यस्थिती आणि उपद्रवी पर्यटकांवर झालेल्या कारवाईची माहिती देणारा अहवाल चार आठवड्यांत सादर करण्याचे आदेश वन विभागाला दिले आहेत. दरम्यान, येत्या आठवडाभरात काजव्यांचा हंगाम सुरू होत असल्याने यंदाच्या महोत्सवाबाबत वन विभाग काय निर्णय घेते आहे, याकडे महोत्सव संयोजकांचे, स्थानिक लघु व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.
काजवे बघण्यासाठी वेळेची मर्यादा
नाशिक, अहिल्यानगर येथील वन विभागाने गेल्या वर्षीच महोत्सवासाठी नियमावली केली होती. काही वन क्षेत्रात त्याची अंमलबाजणीही झाली होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशांच्या पार्श्वभूमीवर यंदा व्यापक स्तरावर नियमावलीची अधिक परिणामकारक अंमलबजावणी करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. याशिवाय पुढील दोन दिवसांत वनाधिकारी काजवा महोत्सव संयोजक, स्थानिक ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींबरोबर बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. बेजबाबदार पर्यटक आणि गरज भासल्यास संयोजकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा वनाधिकाऱ्यांचा विचार आहे. काजवे बघण्यासाठीदेखील वेळेची मर्यादा निश्चित करण्यात येणार आहे.
Gondia News: सर्व मित्र पास झाले, मीच नापास; नैराश्यातून बारावीच्या विद्यार्थ्याने वाढदिवशीच संपवलं जीवन
‘एनजीटी’ने दिलेल्या आदेशानुसार काजवा महोत्सवाची सद्यस्थिती आणि नियमावलीचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या वर्षीच्या महोत्सवाचा हंगाम जवळ आल्यामुळे पर्यटकांच्या व्यवस्थापनासाठी आम्ही स्थानिक संयोजकांबरोबरही बैठक घेणार आहोत. पर्यटकांना शिस्त लावण्यासाठी नियमावली अधिक कठोर करण्याचा विचार आहे. निसर्ग, जैववैविध्याचे नुकसान न करता पर्यटन झाले पाहिजे. – रूपेश गावित, वन परिक्षेत्र अधिकारी, भंडारदरा
उपद्रवी पर्यटक
झाडांवर बॅटऱ्यांचे झोत मारतात
कॅमेऱ्याचे फ्लॅश वापरतात.
जंगल परिसरात रात्रीच्या वेळी कोठेही गाड्या घेऊन जातात.
मद्यपान करतात, जंगलात प्लास्टिकचा कचरा फेकतात
वन क्षेत्रात सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात
काजव्यांना बरण्यांमध्ये पकडून घरी नेण्याचे प्रकारही वाढले आहेत.

