• Sat. Mar 7th, 2026

    राज ठाकरे काय म्हणाले महत्त्वाचं नाही, ‘ऑपरेशन सिंदूर’वर ‘मनसे’ भाष्य, फडणवीसांनी फटकारलं

    राज ठाकरे काय म्हणाले महत्त्वाचं नाही, ‘ऑपरेशन सिंदूर’वर ‘मनसे’ भाष्य, फडणवीसांनी फटकारलं

    Operation Sindoor Updates : ‘राज ठाकरे काय म्हणतात, याला महत्त्व नाही. संपूर्ण भारत या कारवाईच्या पाठीशी उभा आहे. संपूर्ण जग भारताची वाहवा करत आहे. भारताच्या पाठिशी संपूर्ण जग उभे आहे,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    मुंबई : ‘भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या कारवाईच्या पाठीशी संपूर्ण भारत आहे, त्यामुळे राज ठाकरे याविषयी काय म्हणतात याला महत्त्व नाही,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फटकारले.

    भारतीय सैन्य दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. यावर प्रतिक्रिया देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते, की ‘पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांना शोधून काढण्यात केंद्र सरकारला अद्याप यश आलेले नाही. दहशतवाद्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही लक्षात राहील, असा धडा शिकवणे गरजेचे होते. अशावेळी पाकिस्तानशी युद्ध करणे किंवा मॉकड्रील आणि एअरस्ट्राईक या गोष्टी फायद्याच्या नाहीत. पाकिस्तान हा अगोदरच बरबाद झालेला देश आहे.’

    त्यावर ‘राज ठाकरे काय म्हणतात, याला महत्त्व नाही. संपूर्ण भारत या कारवाईच्या पाठीशी उभा आहे. संपूर्ण जग भारताची वाहवा करत आहे. भारताच्या पाठिशी संपूर्ण जग उभे आहे,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    ‘ऑपरेशन सिंदूरसाठी लष्कराचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो. पाकिस्तानात दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उध्वस्त करण्याचे काम सेनेने केले. ज्या प्रकारे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत होता, पहलगाममध्ये आमच्या बांधवांना मारण्यात आले, त्याचा संताप संपूर्ण भारतात होत आहे. भारताने गेल्या १४ दिवसांत सगळ्या देशाशी संपर्क करून पाकिस्तान कसा दोषी आहे ते सांगितले, त्याची माहिती दिली. त्यामुळेच, विविध देश आपल्या पाठीशी आहेत,’ असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.
    Yogesh Kadam : वाघाने फक्त पंजा उगारलाय, अजून जबडा उघडायचाय; योगेश कदमांनी ललकारलं, म्हणतात POK ही ताब्यात…
    दुसरीकडे, पाकिस्तानविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेची माहिती देण्यासाठी संसदीय ग्रंथालयात सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. सर्वपक्षीय बैठकीत गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, निर्मला सीतारमन, ‘एआयएमआयएम’चे नेते असदुद्दीन ओवेसी, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या सुप्रिया सुळे, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, बीजेडीचे सस्मित पात्रा, माकपचे जॉन ब्रिटास, द्रमुक नेते टी. आर. बाळू, शिवसेना (उबाठा) पक्षाचे संजय राऊत आदी नेते उपस्थित होते.

    Devendra Fadnavis : राज ठाकरे काय म्हणाले महत्त्वाचं नाही, ‘ऑपरेशन सिंदूर’वर ‘मनसे’ भाष्य, फडणवीसांनी फटकारलं

    ‘या संकटात आम्ही सारे पक्ष देश आणि सरकारसोबत आहोत. सरकारवर टीका करण्याची गरज नाही. आम्ही सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे’, असे राहुल यांनी सांगितले. तर, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहावे आणि दहशतवादाविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल त्यांचे मत व्यक्त करावे अशी आमची इच्छा होती; परंतु ते आले नाहीत. मागील बैठकीलाही ते आले नव्हते’, अशी खंत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बोलून दाखवली.
    Amit Thackeray : वडिलांचा सल्ला ऐकायला हवा होता, अमित ठाकरे यांनी खंत बोलून दाखवली, राज ठाकरेंनी काय सांगितलेलं?
    ‘सीमेजवळील लोकांची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे आणि जम्मू-काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबांची काळजी घेतली पाहिजे’, असे ‘इंडिया’तील सर्व पक्ष आणि इतर नेत्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ‘लष्कर-ए-तोयबा’च्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या दहशतवादी गटाविरुद्ध आपण, भारताने जागतिक मोहीम सुरू केली पाहिजे’, असे मत ओवेसी यांनी व्यक्त केले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed